Iran War Update : जगातला अजून एक मोठा माणूस बड्या देशाचा राष्ट्रप्रमुख बोलला पीएम मोदी हे युद्ध थांबवू शकतात
Iran War Update : सध्या मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात जगातल्या अनेक देशांचं लक्ष भारताकडे लागलं आहे. भारत हे युद्ध थांबवू शकतो असं काही देशांचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांना अपेक्षा आहेत. पण असं वाटण्यामागे काय कारणं आहेत?.

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने युद्ध सुरु केल्यानंतर आता हे युद्ध कधी थांबणार? असाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. जगाच्या नजरा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लागल्या आहेत. पीएम मोदीच हे युद्ध संपवू शकतात असं अनेक एक्सपर्ट्सच मत आहे. आता फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्जेंडर स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आग्रह केला आहे की 18 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष त्यांनी थांबवावा. राष्ट्रपती स्टब अलीकडेच नवी दिल्लीत आयोजित रायसीना डायलॉग 2026 प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी भारताच्या कूटनितीचं कौतुक केलं. फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्जेंडर स्टब म्हणाले की, “आपल्याला युद्धबंदीची गरज आहे. मी विचार करतोय की, भारत खरच यामध्ये सहभागी होऊ शकतो का?” भारताची या युद्धात तटस्थतेची भूमिका आहे. युद्ध लढणाऱ्या तिन्ही देशांसोबत भारताचे चांगले मैत्री, व्यापारी संबंध आहेत.
सीजफायरसाठी भारत आणि पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा असलेले स्टब एकटे नाहीयत. अमेरिकी सैन्याचे रिटायर्ड कर्नल आणि अनुभवी रणनीतिकार डगलस मॅकग्रेगर यांनी सार्वजनिकरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना, युद्धातून बाहेर निघण्यासाठी भारताची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेचा मिसाइल स्टॉक संपत चालल्याचा मॅकग्रेगर यांनी इशारा दिला आहे. 300 डॉलर प्रति बॅरलच तेल संकट टाळण्यासाठी कूटनिती एकमेव पर्याय असल्याचं मॅकग्रेगर यांनी म्हटलं आहे.
एका फोनवर हे युद्ध थांबेल
“युद्ध थांबवायचं असेल तर राष्ट्रपती ट्रम्प यांनी पीएम मोदींना फोन करावा. भारताचे इस्रायल, इराण आणि चीन सोबत संतुलित संबंध आहेत. पीएम मोदी असे व्यक्ती आहेत, जे कुठल्याही पक्षाला आक्रमक न वाटता त्यांच्याशी चर्चा करु शकतात” असं मॅक ग्रेगर म्हणाले. त्यांच्याआधी UAE चे भारतातील माजी राजदूत हुसैन हसन मिर्जा यांनी सुद्धा असाच सल्ला दिलेला. “युद्ध समाप्तीला मदत करण्यासाठी पीएम मोदी सर्वाधिक उपयुक्त व्यक्ती आहेत. पीएम मोदी यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इराणी नेत्यांना फक्त एक फोन कॉल केल्यास हे युद्ध थांबू शकतं” असा विश्वास हुसैन हसन मिर्जा यांना आहे.
पंतप्रधान मोदींबद्दल इतका विश्वास का वाटतो?
मिडिल ईस्टमध्ये सुरु झालेल्या युद्धाला दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झालेत. सगळ्या जगावर आता या युद्धाचे परिणाम होऊ लागले आहेत. कच्चा तेलाच्या किंमती भडकत चालल्या आहेत. या युद्धाचा शेवट दिसत नाहीय. चीनने इराण युद्धात मध्यस्थतेची तयारी दाखवली आहे. पण बीजिंगच्या निष्पक्षतेवर कोणाचा विश्वास नाहीय. कारण हा देश अनेक दशकांपासून इराणच्या जवळ आहे. भारताने स्वातंत्र्यापासून युद्ध काळातही कुठल्याही देशाचं समर्थन केलेलं नाही. भारताचे इराण, इस्रायल आणि अमेरिका या तिन्ही देशांसोबत चांगले मैत्रीसंबंध आहेत. महत्वाचं म्हणजे संवाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंजामिन नेतन्याहू यांचे चांगले मित्र आहेत. अलीकडेच त्यांनी इराणचे राष्ट्रपती महामहिम डॉ. मसूद पेज़ेशकियन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यामुळे पीएम मोदी हे युद्ध थांबवू शकतात असं अनेकांना वाटतं.
