डोळ्यात अश्रू, हातात रिकामी भांडी घेऊन भटकणारी मुले…; गाझाचं भयाण वास्तव जाणून घ्या

इस्रायलने अलीकडेच गाझावरील संपूर्ण निर्बंध शिथिल केले आहे. असं असलं तरी आतापर्यंत केवळ 300 ट्रक अन्न पोहोचू शकले आहेत. गाझाच्या जबलियामध्ये मानवतावादी शोकांतिका वाढत आहे. लोक उपाशी आहेत, मुलांना डाळीसाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मदत ट्रकच्या तुटवड्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.

डोळ्यात अश्रू, हातात रिकामी भांडी घेऊन भटकणारी मुले...; गाझाचं भयाण वास्तव जाणून घ्या
gaza
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: May 26, 2025 | 1:59 PM

डोळ्यात अश्रू, हातात रिकामी भांडी घेऊन भटकणारी मुले… हे चित्र गाझातलं आहे. चित्रं खोटं बोलत नाहीत. आणि गाझाच्या जबलियाच्या या चित्रातील किंचाळणे ना तोंडातून बाहेर निघत आहे ना शब्दात बांधले जात आहे, फक्त डोळ्यांतून आश्रू ओसंडून वाहत आहे. धुळीने माखलेले चेहरे, घामाने भिजलेले कपाळ आणि थरथरत्या हातांनी धरलेली भांडी. कुणी स्टीलची प्लेट, कुणी तुटलेली बादली, कुणी प्लॅस्टिकची वाटी, सगळ्यांचा एकच हेतू ते म्हणजे मिळेल ते खाणं. इस्रायलने अलीकडेच गाझावरील संपूर्ण निर्बंध शिथिल केले आहे. असं असलं तरी आतापर्यंत केवळ 300 ट्रक अन्न पोहोचू शकले आहेत.

हे चित्र गाझामधील वाढत्या मानवतावादी शोकांतिकेचा जिवंत पुरावा आहे. इथले लोक उपासमारीने मरत आहे. गाझा सिव्हिल डिफेन्सचे प्रवक्ते महमूद बसाल म्हणतात, “हे मृत्यूचे ‘स्लो पॉइझन’ आहे. चित्रात दिसणारी मुलं लहान असली तरी चेहऱ्यावर भुकेचा असा अनुभव आहे जो कदाचित त्यांना आयुष्यभर सोडणार नाही. एक वाटी डाळीसाठी तासंतास रांगेत उभे राहतात, तरीही अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागते. आई आपल्या बाळांना हातात घेऊन भांडी धरत आहेत, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना त्यांनी शेवटचे कधी खाल्ले हे देखील माहित नाही.

केवळ 300 ट्रक अन्न पोहोचू शकले

इस्रायलने अलीकडेच गाझावरील संपूर्ण निर्बंध शिथिल केले असले तरी महमूद बासल म्हणतात की “बहुतेक लोकांना अद्याप पिठाची पिशवी मिळालेली नाही.” आतापर्यंत केवळ 300 ट्रक अन्न पोहोचू शकले आहेत.

गंभीर कुपोषणामुळे गाझामधील नवजात अर्भक आणि अकाली बाळांची अवस्था सर्वात वाईट आहे. त्यांना दूध मिळत नाही, आवश्यक पोषक तत्वेही मिळत नाहीत. जबलियासारख्या भागात कम्युनिटी किचन ही लोकांची शेवटची आशा बनली आहे. पण त्यांच्याकडे पुरेसे रेशन किंवा संसाधने नाहीत. काही स्वयंसेवक किमान जीव वाचवण्यासाठी उकडलेली डाळ, पोळी अशा साध्या गोष्टी कसेबसे शिजवत आहेत.

जग ऐकतंय का?

भारतासह अनेक देश मानवतावादी मदत पाठवण्याच्या गप्पा मारत आहेत, पण वास्तव हे आहे की, जोपर्यंत भक्कम आणि सुरक्षित मदत व्यवस्था अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत या चेहऱ्यावर सुटकेची आशा नाही. गाझाचा हा फोटो एकदाही पाहिला तर तुम्हाला वाटेल की ही केवळ कोणाची गोष्ट नाही. ही त्या सर्व माणसांची ओरड आहे जी फक्त जगण्याचा हक्क मागत आहेत.