
नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यात सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक बस अपघात झाला. पर्यटकांचे मुख्य केंद्र असलेल्या पोखराहून राजधानी काठमांडूकडे जाणारी एक प्रवासी बस नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून सुमारे ३०० फूट खाली त्रिशुली नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये न्यूझीलंडच्या दोन पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर आता सध्या बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Ga 1 Kha 1421 या क्रमांकाची बस रविवारी रात्री पोखराहून प्रवाशांना घेऊन निघाली होती. पहाटे १.३० च्या सुमारास अनेक प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिका-५ मधील भैसपती परिसराजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्यावरून घसरत सुमारे ३०० मीटर खोल उतारावरून थेट नदीपात्रात कोसळली. या भीषण आघातामुळे बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघाताची माहिती मिळताच नेपाळ लष्कर (Nepal Army), सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्रीची वेळ असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले.
पहाटेची वेळ असल्याने आणि परिसर डोंगराळ असल्याने बचाव पथकाला केवळ हातातील टॉर्चच्या प्रकाशावर रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. ही बस ज्या ठिकाणी कोसळली, तिथे पोहोचणे अत्यंत कठीण होते.
यावेळी जखमींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने बोटींचा वापर करण्यात आला. अनेक प्रवाशांना नदीच्या पात्रातून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरक्षित किनाऱ्यापर्यंत बोटीने आणले गेले आणि तिथून रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवण्यात आले.
मुख्य जिल्हा अधिकारी सुवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये १२ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. तसेच यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश असून ते दोघेही न्यूझीलंडचे रहिवाशी आहेत.
तसेच या दुर्घटनेत २७ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये ८ महिला, १८ पुरुष आणि १ अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. सध्या जखमींवर धाडिंग आणि काठमांडू येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धाडिंग जिल्हा वाहतूक पोलीस कार्यालयाचे प्रमुख शिशिर थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात प्राथमिकदृष्ट्या चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने घडल्याचे दिसते. मात्र, महामार्गाची दुरवस्था किंवा तांत्रिक बिघाड या पैलूंचीही तपासणी केली जात आहे. नेपाळमध्ये अरुंद रस्ते आणि डोंगराळ भागातील तीव्र वळणे यामुळे वारंवार असे अपघात होत असतात.