नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट, PM मोदींचा थेट बालेन शाह यांना फोन; नेमकी चर्चा काय?
PM Modi Calls Balen Shah : नेपाळमधील पुराच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधानांनी पुराच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या जीवित व वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला.

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भारतातील 105 पर्यटकांसह अनेक पर्यटक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या पुरामुळे हजारो लोकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. अशातच आता या पुराच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधानांनी पुराच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या जीवित व वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच पंतप्रधान मोदी यांनी नेपाळला सर्वतोपरी मानवतावादी आणि मदतकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील पूरस्थितीबाबत नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना फोन करून माहिती घेतली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात पंतप्रधानांनी म्हटले की, या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींसोबत ठामपणे उभी आहे. भारत आणि नेपाळच्या पथकांकडून बचाव आणि मदतकार्यात समन्वयाने काम केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील आपत्तीग्रस्त भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी भारतीय दूतावास नेपाळ सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. भारतातील 105 पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यातील बहुतांशी लोक हे पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे.
Spoke to Prime Minister Balendra Shah and conveyed condolences on the loss of lives due to the floods in Nepal. The people of India stand in solidarity with their sisters and brothers in Nepal at this difficult time.
India is ready to provide all possible humanitarian…
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
नेपाळमध्ये 400 जण बेपत्ता
तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात बुधवारी अचानक आलेल्या पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या आपत्तीत सुमारे 400 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये किमान 105 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजता भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरामुळे किमान डझनभर जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.
भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी
नेपाळमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. दूतावासाने सांगितले की, नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या भारतीय नागरिकांशी संबंधित मदत आणि माहितीसाठी +977 985 131 6807 आणि +977 970 910 7500 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्ही आपत्कालीन क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारेही संपर्क साधता येणार आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशात अलर्ट
नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे. दरम्यान, पुराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याचीही माहिती समोर आली आहे.