इराण-अमेरिका युद्धाचा जगात सर्वाधिक फटका पाकिस्तानला, अक्षरश: दिवाळच निघालं, खुद्द पाक पंतप्रधानानीच…
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद सोडवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानची स्वत:ची हालत काही चांगली नाहीये. खुद्द त्यांच्या पंतप्रधानांनीच हे कबूल केलंय. इराणचं युद्ध पाकिस्तानसाठी मोठं संकट ठरलंय.

‘घरात नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा..’ ही म्हण तु्म्ही अनेकदा ऐकली असेल ना. सद्यस्थितीत ही म्हण पाकिस्तानला अगदी चपखल लागू होते. कर्जात अगदी गळ्यापर्यंत डुबलेला पाकिस्तान सध्या आर्थिक तंगीशी झुंजतोय, लढा देतोय. आणि हे दुसरं कोणी म्हणतं नाहीये, तर खुद्द पाकच्या पंतप्रधानांनीच ही कबुली दिली आहे. इराण-अमेरिकेत झालेल्य युद्धामुळे, त्यांना (पाकला) मोठा आर्थिक फटका बसल्याचं शरीफ यांनी कबूल केलं आहे.
बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना पाकिस्तानी पंतप्रधानांनी सांगितलं की, इराण युद्धामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त दबाव आला आहे. मात्र, (इराण-अमेरिका) दोन्ही बाजूंमधील तणाव कमी करण्यासाठी आणि पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं सरकार आपले प्रयत्न सुरूच ठेवेल, असंही ते म्हणाले.
‘US-ईराणने मोडलं पाकचं कंबरडं’
अमेरिका-इराण युद्धामुळे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला असं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी (29 एप्रिल) सांगितलं. ” गेल्या दोन वर्षांत साधलेल्या आर्थिक प्रगतीला गंभीर धक्का बसला आहे” असं त्यांनी नमूद केलं. मात्र असं असलं तरी त्याचं सरकार दोन्ही बाजूंमधील तणाव कमी करण्यासाठी आणि पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवेल, असंही ते म्हणाले.य
पाकिस्तानचा आर्थिक बोजा वाढला
फेब्रुवारीमध्ये अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारात इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. “युद्धापूर्वी तेलावरील साप्ताहिक खर्च सुमारे 30 कोटी अमेरिकन डॉलर्स होता, मात्र तोच खर्च आता वाढून 80 कोटी डॉलर्स झाला आहे,” असे ते म्हणाले. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान शाहबाज म्हणाले की, एक कार्यदल दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रोजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
स्वत:च थोपटली आपली पाठ
इस्लामाबादमध्ये 11 एप्रिल रोजी सुरू झालेली आणि 21 तारखेपर्यंत चाललेली इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा ही एक महत्त्वपूर्ण राजनैतिक उपलब्धी मानली जाते, असं पाकिस्तानी पंतप्रधानांनी सांगितलं. लष्करप्रमुख आसिम मुनीर, उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या योगदानासह, पाकिस्तानने ही चर्चा यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं. .
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी म्हणजे याच प्रयत्नांना आलेलं यश आहे, अशा शब्दांत त्यांनी वर्णन केलं आणि ती अजूनही सुरू असल्याचं सांगितले. पंतप्रधानांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या पाकिस्तान दौऱ्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. शहबाज यांची अराघची यांच्यासोबत दोन तास बैठक झालली. दोन्ही देशांतील हा संघर्ष लवकर संपुष्टात येईल अशी आशा शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.