US Tariff : भारताला कधी मिळणार दिलासा ? 18% टॅरिफ कधीपासून होणार लागू ? मोठी अपडेट समोर

भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अमेरिकेने लादलेला अतिरिक्त 25 टक्के कर अर्थात टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे कधीपासून लागू होणार आहे, त्याची तारीख आता समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी या निर्णयाचे स्वागत करत याला भारत-अमेरिका संबंधांना चालना देणारे महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे.

US Tariff : भारताला कधी मिळणार दिलासा ? 18% टॅरिफ कधीपासून होणार लागू ? मोठी अपडेट समोर
US Tariff
| Updated on: Feb 07, 2026 | 10:15 AM

US India Trade Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांटचे धक्कादायक निर्णय जगासाठी काही नवीन नाहीत. दररोज ते नव्या घोषणा करत, निर्णय जाहीर करत असतात आणि अख्खं जग हादरत असतं. अशीच घोषणा त्यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती ती भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची, त्यामुळे भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर एकूण 50 टक्के कर लागणार होता. मात्र त्याचा जोरदार निषेध करण्यात आला, भारताने आपली भूमिका सोडली नाही. अखेर ट्रम्प यांना आपला निर्णय फिरवावा लागला. अमेरिकेने भारतावरील 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याविषयीची घोषणा केली आणि भारतीयांना मोठा दिलासा मिळाला.

18% टॅरिफ कधीपासून लागू ?

मात्र हा निर्णय नेमका कधीपासून लागू होणार याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न होते. तर आता याबद्दलची अपडेटही समोर आली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार, सुधारित 18 टक्के टॅरिफ प्रणाली ही आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आदेश भारतीय वेळेनुसार आज सकाळी 10:30 वाजता लागू होईल. यानंतर, भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर 25 टक्के अतिरिक्त ट2रिफ लागणार नाही.

व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशानुसार, भारतावर लादण्यात आलेले अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्क आता रद्द करण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर यासोबतच, अमेरिकेच्या अधिकृत टॅरिफ लिस्टमध्ये समाविष्ट असलेले भारताशी संबंधित विशेष कोड आणि तरतुदी देखील काढून टाकण्यात आल्या आहेत, ज्या अंतर्गत ही अतिरिक्त शुल्क लादले जात होते. त्यामुळे हा आदेश 7 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर अमेरिकेत वापरासाठी येणाऱ्या किंवा गोदामांमधून काढून टाकल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंना लागू आहे. याचा अर्थ असा की या तारखेनंतर भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ किंवा आकारला जाणार नाही. भारतासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका अंरिम ट्रेड फ्रेमवर्कचे स्वागत केले आणि हेदोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारे असल्याचे त्यांनी म्हटलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीवर एक करार झाल्याचे सांगत पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. हे फ्रेमवर्क दोन्ही देशांमधील वाढता विश्वास, भागीदारी आणि गतिमानता प्रतिबिंबित करते असंही मोदींनी नमूद केलं.

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध मजबूत होतील. भारतीय निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेत दिलासा मिळेल आणि अनेक क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढेल.विशेषतः उत्पादन आणि निर्यात क्षेत्रांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.