शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

| Updated on: Nov 13, 2020 | 4:03 PM

रवी राणा यांच्या नेतृत्वात अमरावतीतील गुरुकुंज मोझरी इथं मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि शेतकऱ्याचंं वीज बिल माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक
Follow us on

अमरावती:  अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढलं. आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

संतप्त आंदोलकांनी यावेळी रस्त्यावर टायर जाळले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्यानं आम्हीही दिवाळी तुरुंगात साजरी करु, असा इशारा रवी राणा यांनी सरकारला दिला आहे. आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं जमिनीही खरडून गेल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला. तरीही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही. त्यामुळे रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग अडवून धरण्यात आला.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शेतकरी, राज्य सरकारला दिलासा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण अद्याप हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या मदतीला उशीर लागण्याची शक्यता होती. पण अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळातही शेतकऱ्यांना मदत देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. वडेट्टीवारांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मिळून 566 कोटी, मराठवाड्यासाठी 2 हजार 639 कोटी, नाशिक विभागासाठी 450 कोटी, पुणे विभागासाठी 721 कोटी, तर कोकण विभागासाठी 104 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करु- सत्तार

“अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्या भागात जास्त नुकसान झालंय त्या भागातील महसूल वसूली थांबवण्याचे आदेश देऊ. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई कोणत्याही परिस्थितीत मिळणार. यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करु”, असं आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी दिलं.

संबंधित बातम्या:

राज्य सरकार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी

ओला दुष्काळ जाहीर करा; लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

An agitation for farmers led by Ravi Rana, demand for help from the state government