तब्लिगींमुळे ‘कोरोना’चा फैलाव होण्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? अनिल देशमुखांचा शाहांवर निशाणा

| Updated on: Apr 08, 2020 | 3:46 PM

अजित डोवाल आणि तब्लिगीचे मौलाना साद दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त मंथन करत होते? अशा शब्दात अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधला. (Anil Deshmukh Questions Amit Shah on Tablighi Jamaat Markaj)

तब्लिगींमुळे कोरोनाचा फैलाव होण्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? अनिल देशमुखांचा शाहांवर निशाणा
Follow us on

पुणे : ‘तब्लिगी जमात’च्या मरकजवरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल चढवला. मरकजच्या शेजारीच पोलिस स्टेशन असताना आयोजन थांबवलं का नाही? यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला. (Anil Deshmukh Questions Amit Shah on Tablighi Jamaat Markaj)

महाराष्ट्रातील ‘तब्लिगी जमात’च्या कार्यक्रमाला सरकारने रोखलं. मात्र दिल्लीत मरकजच्या शेजारीच पोलिस स्टेशन असताना आयोजन थांबवलं का नाही? मरकजमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व राज्यात झाला, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दोन वाजता मरकजमध्ये पाठवलं. हे काम डोवाल यांच नसून दिल्ली पोलिस आयुक्तांचं आहे. अजित डोवाल आणि तब्लिगीचे मौलाना साद दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त मंथन करत होते? अशा शब्दात अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधला.

हेही वाचा : मुंबईत 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्ह्याची नोंद

अजित डोवाल आणि पोलिस आयुक्त दोघांनी या विषयावर बोलायचं का टाळले? डोवाल यांना भेटल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मौलाना कुठे फरार झाले? आणि आता ते कुठे आहेत? कोणाचे संबंध आहेत? अशा प्रश्नांची सरबत्ती अनिल देशमुख यांनी केली.

मरकज आयोजनाची परवानगी तुमची, कार्यक्रमाला तुम्ही रोखलं नाही, तब्लिगीशी संबंध तुमचे, या प्रश्नांचे उत्तर कोण देणार? असंही देशमुख यांनी विचारलं.