कॅन्सरच्या निदानानंतर 15 दिवसात चिमुकल्याने प्राण सोडले, अंत्यसंस्कारासाठी दाम्पत्य यूएईहून मायदेशी

| Updated on: May 18, 2020 | 12:37 PM

यूएईमध्ये राहणाऱ्या कृष्णदास आणि दिव्या यांचा चार वर्षांचा मुलगा वैष्णव कृष्ण दास याचे रक्ताच्या कर्करोगाने 8 मे रोजी निधन झाले. (Assam Doctor Helped Kerala Couple to Fly 4 Year Old Son's Body From UAE)

कॅन्सरच्या निदानानंतर 15 दिवसात चिमुकल्याने प्राण सोडले, अंत्यसंस्कारासाठी दाम्पत्य यूएईहून मायदेशी
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात पुढे करणारे अज्ञात चेहरे कमी नाहीत. कॅन्सरच्या निदानानंतर अवघ्या 15 दिवसात चार वर्षांच्या चिमुकल्याने जगाचा निरोप घेतल्यामुळे यूएईतील भारतीय दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र आसाममधील डॉक्टरने केलेल्या मदतीमुळे मुलाच्या पार्थिवावर केरळमध्ये अंत्यसंस्कार करण्याची या दाम्पत्याची इच्छा पूर्ण होणार आहे. (Assam Doctor Helped Kerala Couple to Fly 4 Year Old Son’s Body From UAE)

यूएईमध्ये राहणाऱ्या कृष्णदास आणि दिव्या यांचा चार वर्षांचा मुलगा वैष्णव कृष्ण दास याचे रक्ताच्या कर्करोगाने 8 मे रोजी निधन झाले. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केरळला येण्याची त्यांची इच्छा होती. परंतु बरेच प्रयत्न करुनही त्यांना यश मिळत नव्हते.

“आम्ही हैराण होतो. आम्हाला जेमतेम 15 दिवसांपूर्वी वैष्णवच्या ल्युकेमियाविषयी समजलं आणि बघता बघता आम्ही त्याला गमावलं. काय होतंय हे समजण्याआधीच आमचं पोर हातून निसटलं होतं. आम्हाला सर्व धार्मिक विधी करुन त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होती. विशेष विमानाने लेकाचा मृतदेह केरळला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि भारतीय दूतावासही आम्हाला सहकार्य करत होते. परंतु बरेच जण परत येण्याच्या मार्गावर होते आणि विशेष विमानांची संख्या मर्यादित होती.” असं कृष्णदास सांगत होते.

“आम्ही आशा गमावली होती. आमच्या मुलाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला होता. त्याचवेळी आसामच्या डिब्रूगडमध्ये राहणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला मदत केली.” असं सांगताना कृष्णदास यांचे डोळे पाणावले. (Assam Doctor Helped Kerala Couple to Fly 4 Year Old Son’s Body From UAE)

भास्कर पापुकन गोगोई हे व्यवसायाने डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली. “मी यूएईतील माझ्या मित्रांशी संपर्क साधला. त्यांची बातमी एका मोठ्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाली होती. मी वृत्तपत्राच्या बातमीदाराशी संपर्क साधला आणि पीडित कुटुंबाच्या नातेवाईकाकडून सर्व माहिती घेतली.” असं गोगोई यांनी सांगितल्याची माहिती ‘एनडीटीव्ही’च्या वेबसाईटवर आहे.

गोगोई यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. “परराष्ट्रमंत्र्यांनी तातडीने पावले उचलली. मी 13 तारखेला त्यांच्याकडे मदत मागितली आणि दुसर्‍याच दिवशी मला त्यांच्या वतीने सांगण्यात आले, की सर्व बंदोबस्त करण्यात आला आहे. आमच्या विनंतीला गांभीर्याने घेऊन तातडीने पावले उचलणे आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शक्य केले आहे.” असं गोगोई म्हणाले.