Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

| Updated on: May 08, 2020 | 9:33 AM

जालन्यातील स्टील कंपनीत हे मजूर काम करत होते. हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे (Aurangabad Labors Killed in Train Mishap)

Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?
Follow us on

औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली. (Aurangabad Labors Killed in Train Mishap)

मालवाहू रेल्वेच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रेल्वे रुळापासून काही अंतरावर असलेले चार मजूर थोडक्यात बचावले. या मजुरांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांचं समुपदेशन करुन त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली जाईल, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

जालन्यातील स्टील कंपनीत हे मजूर काम करत होते. हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते भुसावळच्या दिशेने पायी निघाले होते, मात्र रात्री थकून त्यांनी रेल्वे रुळावरच झोप घेतली. सर्वांची नावे, पत्ते यांची पडताळणी करुन यादी केली जात आहे, असंही मोक्षदा पाटील यांनी सांगितलं.

पहाटे 5.15 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने धडक दिलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.

पहाटे काही कामगारांना रुळावर पाहून मालगाडीच्या लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना परभणी-मनमाड विभागातील बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान धडक बसली. जखमींना औरंगाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. (Aurangabad Labors Killed in Train Mishap)

हेही वाचा : औरंगाबादेतील मजुरांच्या मृत्यूने सुन्न! स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळूहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत.

भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत.

(Aurangabad Labors Killed in Train Mishap)