उत्तरप्रदेशात 20 जणांनी भरलेली बोट पलटी, एकाचा मृत्यू, तीन बेपत्ता
उत्तर प्रदेशच्या बहराईच येथील शरयू नदीमध्ये एक बोट पलटी झाली. या बोटीत एकूण 20 जण होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीनजण बेपत्ता आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बहराईच येथील शरयू नदीमध्ये एक बोट पलटी झाली. या बोटीत एकूण 20 जण होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीनजण बेपत्ता आहेत. तर 10 जणांनी पोहत आपला जीव वाचवला. ही घटना बहराईच्या लोकहीब गावातील असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या येथे पोलीस दाखल झाले असून बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत.
बोटीतून प्रवास करणारे सर्वजण शेतकरी होते. हे सर्व आपल्या कामासाठी नदी किनारी शेतात पेरणी करण्यासाठी जात होते. यावेळी ही बोट उलटून हा अपघात घडला. दरम्यान, प्रत्येकवर्षी नेपाळमधून पाणी सोडलं जाते त्यामुळे या गावात पूरग्रस्त परिस्थिती तयार होते. अशामध्ये गावातले शेतकरी बोटीने प्रवास करत शेतात कामासाठी जातात.
“भारत-नेपाळ सीमेवर रविवारी लोकहीब गावातून 20 शेतकरी बोटीने शरयू नदीच्या पलीकडे जात होते. यावेळी नदीच्या मध्यभागी बोट पलटी झाली. या घटनेत एका शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे. तर चार शेतकरी सुरक्षित बाहेर आले असून इतर बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध सुरु आहे”, अशी माहिती घटनास्थळी पोहचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली.
“बचावकार्य पथक सध्या बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध घेत आहे. गावाकरीही या कार्यसाठी मदत करत आहेत. सलग पाऊस पडत असल्यामुळे आणि नेपाळमधून पाणी सोडल्यामुळे शरयू नदीच्या पातळीत वाढ झाली आहे”, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.