गुणांची सरासरी काढून निकाल, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा

| Updated on: May 31, 2020 | 9:46 PM

जर कोणाला अधिक गुण मिळवण्याची इच्छा असेल, तर त्यांनाही आपण परीक्षेची संधी देऊ, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (Uddhav Thackeray on University Result)

गुणांची सरासरी काढून निकाल, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा
Follow us on

मुंबई : राज्यात सर्व विद्यापीठातील पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तातडीने घेणे शक्य नाही. त्यामुळे जितकी सत्र (सेमिस्टर) झाली, त्यांच्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात पाचव्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली. (CM Uddhav Thackeray on Final Year University Students Result)

परीक्षांचं काय करायचं यावर काम सुरु आहे. मी कुलगुरुंची बैठक घेतली. सर्वांचं म्हणणं आहे की तात्काळ परीक्षा घेणं शक्य नाही. ते कुलगुरु आणि मी मुख्यमंत्री असलो, तरी आमच्यातील पालक जिवंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जितकी सत्र झाली, त्यांच्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जर कोणाला अधिक गुण मिळवण्याची इच्छा असेल, तर त्यांनाही आपण परीक्षेची संधी देऊ. ज्यांना आपण सरासरीपेक्षा अधिक गुण मिळवू शकलो असतो, असं वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री

ग्रामीण भागात पूर्ण खबरदारी घेऊन शक्य असल्यास शाळा सुरु करु, शहरी भागात ऑनलाईन, टीव्ही, रेडीओ, एसडी कार्डने ई-लर्निंग सुरु करण्याची चाचपणी करत आहोत. येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. (CM Uddhav Thackeray on Final Year University Students Result)

पहिलं वर्ष सुरु कसं करणार, पहिलीची सुरुवात कशी करणार, हेही प्रश्न आहेत. शाळा सुरु करायच्या का हाही प्रश्न आहे. सध्या या शाळा विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, असं असलं तरी शाळा सुरु करण्यासाठी त्या शाळा मोकळ्या करता येतील. त्यांचं निर्जंतुकीकरण करता येईल. मात्र, इतर देशांमध्ये शाळा सुरु करुन बंद करण्याची वेळ आली. शाळा सुरु करण्याऐवजी शिक्षण सुरु करण्यावर आपला भर आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शाळा सुरु करता आल्या तर तेही पाहिलं जाईल. पण शहरात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याबाबत पर्याय तपासले जातील, असंही ते म्हणाले.

शिक्षण सुरु झालंच पाहिजे, मात्र कोरोनाने आपल्याला काही गोष्टी शिकवल्या आहेत. त्याने आपल्याला शिक्षणाकडे, आरोग्याकडे पाहायला शिकवले. याआधी कदाचित शिक्षण आणि आरोग्याकडे तितकं लक्ष दिलं गेलं नसेल, मात्र, आता आपल्याला कोणत्याही परिस्थिती या गोष्टी सुरु राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल. येत्या काळात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागात, छोट्या शहरात रुग्णालयांची व्यवस्था सज्ज ठेवायची असा निर्णय घेण्यात येणार आहे. इतरवेळी या इमारती इतर गोष्टींसाठी वापरता येतील. मात्र, गरजेच्यावेळी या सुविधा आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरता येईल यावर भर दिला जाईल. आता जबाबदारी आणि खबरदारी दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सरकारने जबाबदारी घेतली आहे, आता तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. सरकार पडणार नाहीच, पण तु्म्ही सोबत असेल तर ते अजिबातच होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.