ज्योतिबा डोंगरावर ढगफुटीसदृश्य पाऊस, पायऱ्यांना धबधब्याचं रुप
विजय केसकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या पावसाचं रौद्ररुप कोल्हापुरात पाहायला मिळालं. कोल्हापूरजवळच्या ज्योतिबा डोंगरावर कोसळलेल्या तुफान पावसामुळे पायऱ्यांवरुन धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं. ज्योतिबा डोंगरावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे मंदिर परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. हे पाणी इतकं होतं की एखादा धबधबा वाहतोय की काय असं वाटत होतं. राज्यभरात […]
विजय केसकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या पावसाचं रौद्ररुप कोल्हापुरात पाहायला मिळालं. कोल्हापूरजवळच्या ज्योतिबा डोंगरावर कोसळलेल्या तुफान पावसामुळे पायऱ्यांवरुन धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं. ज्योतिबा डोंगरावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे मंदिर परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. हे पाणी इतकं होतं की एखादा धबधबा वाहतोय की काय असं वाटत होतं.
राज्यभरात पावसाचा जोर
दिवाळीतनंतरच्या गुलाबी थंडीत अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागांत हजेरी लावली. आज पहाटे राज्यात कोकण, मराठवाड्यासह अकोला, वाशिम, जळगाव, नाशिकमध्येही रिमझिम पाऊस झाला. या अवकाळी पावसाने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचे ठरले आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काल संध्याकाळी ढगाळ वातवरणानंतर रिमझिम पावसाची सुरुवात झाली. मुंबईतही आज पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
दिवाळीनंतर काही ठिकाणी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे चांगलाच फटका पिकांना बसलेला आहे. तर हरभरा पिकाला फायदा झाला असून कपाशी, तूर आणि ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकाटसह पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकाला चांगला फायदा झाल्याचे दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात शेतकरी आनंदी
वाशिम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून रब्बीतील हरभरा, गहू,तसेच तूर पिकाला चांगला फायदा होणार आहे.त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. यंदा परतीच्या पावसानं दगा दिल्यामुळं जमिनीत ओलावा नसल्याने रब्बीतील पीक करपत होती. मात्र आज आलेल्या अवकाळी पावसानं पिकाला दिलासा मिळाला आहे.
पिकांचं नुकसान
राज्यात अचानक सुरु झालेल्या पावसामुळे पिकांच नुकसान झाल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी पिकांना याचा फटका बसला. तर ऊसतोडीही बंद करण्यात आली आहे. या पावसामुळे द्राक्षांच्या बागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईतही पावसाची शक्यता
मुंबईतही पावसाच्या हजेरीची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. दिवाळीत मुंबई, नवी मुंबई आणि परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती.