कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, 40 प्रयोगशाळांच्या मदतीने 1 लाखाचा टप्पा पार

| Updated on: Apr 25, 2020 | 9:08 PM

महाराष्ट्र सरकारने राज्यात 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून शुक्रवारी (24 एप्रिल) 1 लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केला आहे (India's Highest corona test in Maharashtra).

कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, 40 प्रयोगशाळांच्या मदतीने 1 लाखाचा टप्पा पार
Follow us on

मुंबई : राज्यात मागील दीड महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यावर नियंत्रणासाठी संशयितांच्या चाचण्या आणि त्यांच्यावर उपाय हाच एकमेव मार्ग सध्या तरी उपलब्ध आहे. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने राज्यात 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून शुक्रवारी (24 एप्रिल) 1 लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केला आहे (India’s Highest corona test in Maharashtra). देशातील सर्वाधिक चाचण्यांची नोंदही महाराष्ट्राच्या नावेच आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु होण्याच्या किमान 1 महिना आधीपासून या चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळेच रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत राज्यात 1 लाख 8 हजार 972 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. 24 एप्रिलला महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांनी 1 लाखांचा टप्पा पार केला. 24 एप्रिलला कोरोना चाचण्यांची ही संख्या 1 लाख 2 हजार 189 इतकी होती. एकूण चाचण्यांपैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, तर 6 हजार 817 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. राज्यात आजमितीस शासकीय 20 आणि खासगी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. राज्यात साधारणत: दररोज 5 ते 7 हजार चाचण्यांची क्षमता आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे.

साधारणत: 21 जानेवारीपासून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनासाठी प्रवाशांची तपासणी केली गेली. त्यानंतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. राज्यात सुरुवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) तपासणीची सुविधा होती. साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील 5 जणांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणपणे 3 महिन्यात राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखावर गेला आहे.

सुरुवातीला फक्त पुणे येथे असलेली ही सुविधा मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय, नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यात आली. संशयित रुग्ण संख्या वाढल्याने दरम्यानच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली. केईएम येथेही सुविधा सुरु झाली. टप्प्याटप्प्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचबरोबर आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्यांना मान्यता दिल्याने राज्यात झपाट्याने प्रयोगशाळांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ठिकठिकाणी चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्याचा रुग्णांच्या निदानात मोठा फायदा होत आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान तब्बल 69 हजार गुन्हे दाखल, 100 नंबरवर 77 हजार कॉल, दोन कोटीपेक्षा अधिक दंड

Maharashtra Corona Live | एका दिवसात 9 नवे रुग्ण, सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 50 वर

Constable corona death | मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर

‘त्या’ एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोना होण्याची भीती : तुकाराम मुंढे

मालेगावातील कोरोनाचा विळखा घट्ट, आणखी 8 जण पॉझिटिव्ह, एकूण आकडा 126 वर

India’s Highest corona test in Maharashtra