काटेकोर इशारा, बिनचूक अंदाज, श्रेयापासून वंचित हवामान विभाग

| Updated on: Sep 23, 2020 | 8:40 PM

पाऊस, वादळ याविषयीचे अनेक अंदाज अचूक येऊनही हवामान विभागाला श्रेय काही मिळालेलं दिसत नाही (Journey of Indian Meteorological Department IMD).

काटेकोर इशारा, बिनचूक अंदाज, श्रेयापासून वंचित हवामान विभाग
Follow us on

मुंबई : ‘अंदाज पावसाचा वाटे खरा असावा, प्रत्येक दिवसाचा तो वेगळा ठरावा’. कधी कवितांमधून तर कधी मिम्समधून हवामान खात्यावर सतत टोमण्यांची लाखोली वाहिली जाते. बदलत्या वातावरणाप्रमाणं त्याचे अंदाजही बेभरवशी असतात असं म्हटलं जातं. आता त्याच हवामान विभागाची सध्याची कामगिरी पाहिली तर आधीचा पूर्वग्रह बदलावा लागेल यात शंका नाही. 22 सप्टेंबरचा मुंबई आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असो, किंवा रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा अंदाज. हवामान विभागाचे हे अंदाज खरे ठरले. या अंदाजांमुळे वेळीच प्रशासन सज्ज झालं. जीवितहानी टाळता आली. बऱ्याच ठिकाणी आर्थिक नुकसानही कमी करता आलं. पण एवढं होऊनही हवामान विभागाला त्याचं श्रेय काही मिळालं नाही (Journey of Indian Meteorological Department IMD).

भारताच्या हवामान अंदाजाचा इतिहास सव्वाशे वर्ष जुना आहे. 1875 ला भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली. त्यावेळी त्याचे पहिले चीफ रिपोर्टर होते ब्लेंडफोर्ड, एक ब्रिटीश अधिकारी. 4 जून 1886 ला त्यांनी मान्सूनच्या पावसाचा पहिला अंदाज दिला. त्यावेळी त्यांनी एकच घटक विचारात घेतला, तो म्हणजे हिवाळा आणि हिमालयातील बर्फाचे प्रमाण. पुढं 1895 ला आयएमडीचे प्रमुख सर गिल्बर्ट वॉकर यांनी यात सुधारणा केल्या. त्यांनी ऑक्टोबर ते मे महिन्यातील हिमालयातील वातावरण, मान्सूनपूर्वच्या महिन्यातील वातावरण आणि हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियातल्या हवामानाचं निरिक्षण या 3 गोष्टींच्या आधारे अंदाज बांधण्याची पद्धती विकसित केली.

नव्या पद्धतीनंतरही 1987 ला हवामानाचे सगळे अंदाज चुकले आणि मोठा दुष्काळ पडला. त्यांनंतर पु्न्हा मान्सूनच्या मॉडेलमध्ये सुधारणा झाल्या. डॉ. वसंत गोवारीकर यांच्या प्रेरणेमुळं पुण्यातील हवामानशास्त्रज्ञ डॉ. व्ही. थपलियाल यांनी हवामानची नवी सूत्रं तयार केली. याला पॉवर रिग्रेशन मॉडल म्हटलं गेलं. त्यानंतही बरेच बदल झाले. सध्या मान्सूनचा अंदाज देण्यासाठी 8 घटकांचा उपयोग केला जातो.

गेल्या काही काळात हवामान विभागात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या आहेत. जगभरातून येणाऱ्या माहितीचं विश्लेषण हवामान शास्रज्ञ करतात. जगभरातल्या हवामान संस्थांकडून माहितीची देवाण-घेवाण होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न केला जातो. अरबी समुद्रासह हिंदी महासागरावर बारीक लक्ष्य ठेवलं जातं आणि त्यातून वेळीच प्रशासनाला हवामान विभाग सतर्क करतं.

हेही वाचा : Mumbai Rains LIVE : नायर रुग्णालयात पावसाचे पाणी, अत्यावश्यक सेवा वगळता कार्यालयांना सुट्टी

‘हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, तर साखरेचं पोतं पाठवू’ असं शरद पवारांनी गमतीत केलेलं वक्तव्य खरं ठरलं होतं. गेल्या काही वर्षात सतत चुकलेल्या हवामानाच्या अंदाजावरुन पवारांनी हवामान विभागाला हा चिमटा काढला होता. आता मात्र हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आणि त्यांनी शब्द पाळत साखरेचं पोतं हवामान विभागाला पाठवलंही. यावरुन हवामान विभागाची बदलेली कामगिरी सर्वांच्याच लक्षात येत आहे.

एवढं करुनही काही वेळा अंदाज चुकतातच. कारण काही केलं तरी हवामानच ते… ज्याच्या स्वभावातच बेभरवशीपणा सामावलाय आता त्याचा अंदाज लावणं एवढंही सोपं नाहीय. कधी कमी दाबाचा पट्टा तयार होईल, कधी वाऱ्याची दिशा बदलेल. अचानक हवामानातील बदलांमुळं कुठं तुफान पाऊस होईल, तर कुठं गारा पडतील हे सांगणं म्हणजे कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखं आहे. तरीही हवामान विभागाची सध्याची कामगिरी कौतुकास्पदच म्हणावी लागेल.

संबंधित बातम्या :

Mumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण

Mumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली

Monsoon Rain | महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, घाट-माथ्यावर दरडी कोसळण्याचा इशारा

संबंधित व्हिडीओ :

Journey of Indian Meteorological Department IMD