‘कोरोना’ लढ्यातील महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच, अजित पवारांची मोठी घोषणा

कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळेल (Maharashtra Police Grant during fight against Corona)

कोरोना लढ्यातील महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच, अजित पवारांची मोठी घोषणा
| Updated on: Apr 03, 2020 | 4:53 PM

मुंबई : ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे. ‘कोरोना’ संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली. (Maharashtra Police Grant during fight against Corona)

राज्यातील पोलिस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आरोग्य, वैद्यकीय, पोलिस विभागांना प्राधान्याने वेतन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मार्च महिन्याचे वेतन प्राधान्याने देणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्डचीही मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान, ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्‌’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) सूट देण्यात देण्यात यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे.

हा निर्णय त्वरीत घेतल्यास मास्क, किट्स्, व्हेटिलेटर्स बाजारात सहज व स्वस्त उपलब्ध होण्यास मदत होईल व त्यातून ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

देशात ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक पद्धतीनं वाढत आहे. महाराष्ट्रात ही संख्या नियंत्रणात रहावी, ‘कोरोना’ प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. संचारबंदी, टाळेबंदी लागू करुन नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ‘कोरोना’बाधित व संशयित रुग्णांच्या शोध घेऊन, त्यांना वेगळे ठेवून प्रत्येकावर स्वतंत्रपणे उपचार सुरु आहेत, कोरोना रुग्णांची आणि प्रसार रोखण्याची संपूर्ण काळजी घेत जात आहे. ‘ट्रेस, ट्रॅक, टेस्ट ॲन्ड ट्रीट’ या मार्गर्शकतत्वांनुसार ‘कोरोना’विरुद्धचा लढा महाराष्ट्रात पूर्णशक्तीनिशी सुरु असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिली आहे. (Maharashtra Police Grant during fight against Corona)