दूध दरवाढीमुळे व्यावसायिकांची चांदी, शेतकऱ्यांचे हात मात्र कोरडेच!

| Updated on: Jan 12, 2020 | 8:51 PM

दुधाच्या वाढलेल्या दरानंतरही शेतकरी मात्र नुकसानच सोसत आहे. कारण, शेतकऱ्य़ाला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत उत्पादन खर्चही भागत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

दूध दरवाढीमुळे व्यावसायिकांची चांदी, शेतकऱ्यांचे हात मात्र कोरडेच!
Follow us on

पुणे : राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी दरवाढ करण्यात आली (Milk rates Increased). गाई आणि म्हशीच्या दूध दरात रविवारपासून (12 जानेवारी) ही दरवाढ लागू झाली. तर बटर आणि पनीरचे दर शंभर ते दोनशे रुपयांवर गेले. त्यामुळे दूध ग्राहकांना तर आर्थिक फटका बसणार आहेच. मात्र, दुधाच्या वाढलेल्या दरानंतरही शेतकरी मात्र नुकसानच सोसत आहे. कारण, शेतकऱ्य़ाला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत उत्पादन खर्चही भागत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत (Milk Rates And Farmers).

दुधाच्या विक्रीत एका महिन्यात तब्बल चार रुपयांची दरवाढ

गायीचं दूध 46 रुपयांवरून 48 रुपये, तर म्हशीचं दूध 56 वरून 58 रुपयांवर पोहोचलं. तर बटर 320 आणि दूध पावडरच्या 330 रुपये प्रतीकिलोवर पोहोचले. बटर आणि पनीरच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल शंभर ते दोनशे रुपयांची दरवाढ झाली आहे.

दूध व्यवसायिक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 73 दूध संघांच्या उपस्थित दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात 20 ते 25 टक्के दुधाचे उत्पादन कमी आहे. राज्यात सध्या दोन कोटी 40 लाख प्रतिदिन दुधाचे उत्पादन होतं. तर दररोज राज्यासाठी प्रतीदिन साधारण साडे तीन कोटी लीटर दूध अपेक्षित आहे. राज्यात दररोज 65 लाख लीटर पॅकिंग दुधाची विक्री होते. मात्र, बटर आणि दूध पावडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे बाजारात दूध कमी असल्याने दुधाच्या खरेदी दरातही दरवाढ करण्यात आली. मात्र, दुधदरवाढीनंतरही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भागत नसल्याची माहिती आहे.

दूध व्यवसायिकांनी विक्री दरात वाढ केली. तर दुग्धजन्य उत्पादनांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला 31 तर म्हशीच्या दुधाला 45 रुपये मिळतात. शेतकऱ्यांसारखीच ग्राहकांची अवस्था आहे. गेल्या महिन्यात तब्बल चार रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे आता आम्हाला ही दरवाढ करणे गरजेचे आहे. मात्र, दरवाढ झाली तर ग्राहकांवर परिणाम होणार असल्याची भीती त्यांना सतावत आहे.

राज्यातील दूध मोठ्या प्रमाणात बटर आणि पावडरसाठी वापरले जाते. त्यामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवत आहे. यंदा दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही कमालीच्या तेजीत आहेत. गेल्या वर्षी 130 रुपये असलेली पावडर यंदा 330 रुपये कीलोवर गेली. तर बटर 220 वरुन 320 प्रतिकिलो रुपयांवर गेलं. मात्र, शेतकऱ्यांना गायीच्या एक लीटर दुधाला केवळ 31 रुपये मिळतात. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, मात्र त्याचा उत्पादन खर्च भागत नाही, तर व्यवसायिक मात्र भरमसाठ नफा कमवत आहेत.