Electricity Bill | लॉकडाऊनमधील 50 टक्के वीज बिल माफ करा, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Jun 26, 2020 | 12:46 PM

घरगुती आणि शेतीचं वीज बिल निम्म्याने माफ करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (Nana Patole request CM Uddhav Thackeray to waive Electricity Bill by 50 percent)

Electricity Bill | लॉकडाऊनमधील 50 टक्के वीज बिल माफ करा, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

नागपूर : लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं 50 टक्के वीज बिल माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (Nana Patole request CM Uddhav Thackeray to waive Electricity Bill by 50 percent)

राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज बिल निम्म्याने माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे.

आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचा वापर वाढला, बिलाचे हप्ते पाडून देणार : ऊर्जामंत्री

दुसरीकडे, विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे वीज बिल पाहूनच अनेकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.

नितीन राऊत काय म्हणाले?

“लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही बिलं लॉकडाऊनमधील तीन महिन्याची आहेत. लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर जास्त झाला. टीव्ही, फॅन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढतेच. दुसरी गोष्ट म्हणजे MERC ने एप्रिलमध्ये विजेचे दर वाढवले आहेत. ते दर लागू झाले आहेत. मागील वर्षीच्या या महिन्याच्या बिलाची आणि यंदाच्या बिलाची तुलना करुन पाहिली तरीही हे वीज बिल माफक आहे हे लक्षात येईल”.

वीज ही अत्यावश्यक असली, तरी त्याचे दर सरकार ठरवत नाही, ते दर MERC ठरवते. खासगी उद्योगाकडून केंद्र सरकारच्या मार्फत वीज घेऊन आम्ही ती ग्राहकांना पुरवतो. त्यामुळे वीजेचे दर वाढले तर आम्ही देणार नाही हे म्हणणं योग्य नाही. वीज जेव्हा वापरतो, तेव्हा त्याचं बिल द्यायला हवं. आम्ही ग्राहकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ज्या उद्योगांचं वीज बिल समजा दहा हजार रुपये आलं असलं, तरी त्यापैकी काही रक्कम भरली तरी त्यांची वीज कट केली जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत, असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं.

संबंधित बातम्या 

Lockdown Effect : रिडिंग न घेता महावितरणकडून अंदाजपंचे बिल, अव्वाच्या सव्वा बिलाने ग्राहक हैराण 

(Nana Patole request CM Uddhav Thackeray to waive Electricity Bill by 50 percent)