मुख्यमंत्री विजय यांच्या एका निर्णयाने तामिळनाडूत चर्चा… थेट दारूच्या दुकानातील…
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार २५% वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचार रोखणे, ग्राहकांकडून होणारी अतिरिक्त वसुली थांबवणे आणि कामात पारदर्शकता आणणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यापूर्वी त्यांनी ७१७ दारूची दुकाने बंद केली होती.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री विजय यांनी असंख्य लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. गोरगरीबांना हात देण्यासाठी त्यांनी निर्णयांचा झपाटाच लावला आहे. त्यातच आता एका निर्णयाची भर पडली आहे. मुख्यमंत्री विजय यावेळी दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांवर मेहरबान झाले आहेत. त्यांनी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्क्याने वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला वेसन घातलं जाईल. ग्राहकांकडून प्रत्येक दारूच्या बॉटलमागे अतिरिक्त पैसे वसूल केले जात आहेत. हा प्रकार पगारवाढीमुळे थांबेल असा सरकारला विश्वास आहे.
टीव्हीके सरकारच्या मते, वेतन संशोधनापासून तस्माक आटलेट्सवर ग्राहकांकडून प्रत्येक बॉटलमागे 10 रुपये अतिरिक्त वसूल केले जात आहे. पगारवाढीमुळे ही प्रथा आता रोखली जाईल, अशी आशा आहे. या प्रकारच्या तक्रारी वारंवार येत असल्यानेच सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा देऊन भ्रष्टाचार रोखण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं आहे.
आदेश सोडले…
विजय सरकारचे मंत्री विग्नेश यांनी ही घोषणा केली. पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता ग्राहकांकडून अधिक रक्कम वसूल केली जाणार नाही, याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचं विग्नेश यांनी सांगितलं. चांगला पगार मिळाल्याने भ्रष्टाचार कमी होईल. तसचे दारूच्या दुकानांमध्ये पारदर्शिकता येईल, असं सराकरचं म्हणणं आहे. गेल्या 20 वर्षापासून दारू विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली नव्हती, अशी माहितीही विग्नेश यांनी दिली.
717 दुकाने बंद
दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी धार्मिक स्थळ आणि शैक्षणिक स्थळ तसेच बस स्थानकाच्या 500 मीटरच्या परिसरातील 717 दारूची दुकाने बंद केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधलं आहे.
सरकारी आकडेवारी नुसार तामिळनाडूत एकूण 4,765 दारूची दुकाने आहेत. त्यातील 717 दुकाने बंद करण्यात आली आहे. ही दुकाने शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक ठिकाण आणि बस स्थानकाच्या परिसरातील आहेत. धार्मिक स्थळाच्या बाजूला 276, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात 186 तर बस स्टँडजवळ 255 दुकाने आहेत.
