पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला

| Updated on: Oct 25, 2020 | 5:52 PM

दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला
Follow us on

बीड: दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. त्यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. (pankaja munde addressing Virtual Dussehra Rally in beed)

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, भाजपच्या राज्य कार्यकारिणीत न लागलेली वर्णी, राष्ट्रीय कार्यकारिणीत मिळालेली संधी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासाथीने भाजप वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला दिलेली सोडचिठ्ठी या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या खास शैलीत तडाखेबंद भाषण केलं. जोपर्यंत मी जीवंत आहे. तोपर्यंत भगवान गडावर येणार. मी आज आमदार नाही. ग्रामपंचायतीची सदस्यही नाही. पण तुम्ही खचून जाऊ नका. मी तुमच्या जीवावरच उभी आहे, असं सांगतानाच मी तुमच्यासोबत आहे. महाराष्ट्रभर फिरणार आहे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आणि पोटात भूक आहे, अशा शेवटच्या माणसासाठी मी झटणार आहे, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्या पॅकेजमध्ये रुमालही येत नाही

यावेळी मुंडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या पॅकेजवरही घणाघाती टीका केली. १० हजार कोटीचं पॅकेज सरकारनं घोषित केलं. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

मुंबईत बसून निर्णय का होऊ शकत नाही

ऊसतोड कामगारांचे निर्णय फडात बसूनच घेतले पाहिजेत असं कुणी सांगितलं. मुंबईत बसूनही निर्णय का होऊ शकत नाही?, असा सवाल करतानाच तुम्ही मुंबईत काय दिल्लीतही असला तरी इच्छा शक्ती असेल तर निर्णय होऊ शकतात. ऊसतोड कामगारांना न्याय मिळू शकतो, असं त्या म्हणाल्या.

120 आमदार बनवायचे आहेत

सध्या रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे सजग राहा. आपली वज्रमुठ कायम ठेवा. आपली वज्रमुठ कायम असेल तर मोठमोठी सत्ताही हादरून जाते. आपल्याला धर्मकारण आणि राजकारणाची सांगड घालायची आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही. आपल्याला राज्यात 120 आमदार बनवायचे आहेत, असं त्या म्हणाल्या.

शिवाजी पार्क भरवायचं आहे

आता मी राज्यात फिरणार आहे. गावोगावी जाऊन पाहणी करणार आहे. कोरोना असला तरी फिरणार आहे. रस्त्यावर कसं उतरायचं हे मला चांगलंच माहीत आहे. आता नुसतं भगवान गडावरच नाही तर आपल्याला मुंबईतलं शिवाजी पार्कही भरवायचं आहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे, अशी घोषणा त्यांनी करताच पंकजा मुंडे जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

संबंधित बातम्या:

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

Pankaja Munde LIVE | दसरा मेळावा |जो दौड कर हरा नही सकते, वो तोड कर हराते है; पंकजा मुंडेचा घणाघात

शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे