
मुंबई | 16 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने देशात सात टप्प्यात निवडणूक घेण्याचं जाहीर केलं आहे. पहिला टप्प्याचं मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातही पाच टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात ना बर्फ पडत, ना हिंसा होत, मग पाच टप्प्यात मतदान कशासाठी? असा थेट सवालच प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलं आहे. मी 1984 पासून निवडणूक लढवत आहे. मी आजपर्यंत निवडणूक काळात महाराष्ट्रात कुठेही गडबड झालेली पाहिली नाही. कुठे दंगा झालेला नाही. एवढंच काय राज्यात दगड मारायला माणूसही मिळत नाही. राज्यातील दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचं कारण काय? निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
बर्फ पडत नाही, दळणवळणाची समस्या नाही
महाराष्ट्रात कुठेही दळणवळणाची समस्या नाही. कुठेही बर्फ पडत नाही. कुठं पाऊस नाही. मग पाच टप्पे का? याच स्पष्टीकरण द्यावं. शांत महाराष्ट्र हा अशांत करायला इलेक्शन कमिशन निघालं आहे का?, असा सवाल करतानाच राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान घ्या आणि दुसऱ्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान घ्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याची गरज नाही. आम्ही त्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहोत. आमचं म्हणणं मांडणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कधी मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान?
पहिला टप्प्यात 5 जागा
दुसरा टप्पा 8 जागा
तिसरा टप्पा 11 जागा
चौथा टप्पा 11 जागा
पाचवा टप्पा 13 जागा
आंबेडकरांची मोर्चेबांधणी
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी जय्यत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असतानाच आंबेडकर यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी निवडणुकीची चर्चा सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून आंबेडकर यांना फक्त दोनच जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्याही पडणाऱ्या जागा आहेत. त्यामुळे आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. महाविकास आघाडीतील या गोंधळाच्या स्थितीमुळे आंबेडकर यांनी शेंडगे यांच्या माध्यमातून नवे पर्याय चाचपायला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे.