अंबरनाथच्या उद्योजकाची राज्य सरकारला खंबीर साथ, हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या 15 लाख गोळ्या मोफत देणार

| Updated on: Apr 29, 2020 | 10:42 PM

रुबाकॉन कंपनीने महाराष्ट्र सरकारला हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या तब्बल 15 लाख गोळ्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे (Rubicon pharma giving hydroxychloroquine to Maharashtra Free).

अंबरनाथच्या उद्योजकाची राज्य सरकारला खंबीर साथ, हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या 15 लाख गोळ्या मोफत देणार
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढतो आहे. या लढाईत रामबाण उपाय म्हणून लस सापडलेली नसली तरी काही पर्यायी औषधं परिणामकारक ठरत आहेत. हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्या या त्यापैकीच एक आहेत. या गोळ्यांसाठी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे केली. याच औषधांची महाराष्ट्रातही गरज असताना अंबरनाथच्या एका मराठी उद्योजकाने राज्य सरकारला खंबीर साथ दिली आहे. या उद्योजकाने महाराष्ट्र सरकारला हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या तब्बल 15 लाख गोळ्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे (Rubicon pharma giving hydroxychloroquine to Maharashtra Free). त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राची हायड्रोक्सीक्लोरीक्वीनची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे. यामुळे महाराष्ट्राला कोरोनाशी लढण्यात मदच होणार आहे.

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही हायड्रोक्सीक्लोरीक्वीन गोळ्यांसाठी भारताची गरज लागली. याच हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्या अंबरनाथ एमआयडीसीतील रुबीकॉन कंपनीत तयार केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या गोळ्या फक्त महाराष्ट्र सरकारला आणि त्यादेखील मोफत दिल्या जाणार आहेत. कोरोनानं जगभरात थैमान घातल्यानंतर या गोळ्यांचं उत्पादन करण्याचा निर्णय रुबीकॉन कंपनीचे मालक सुमंत पिळगावकर यांनी घेतला. तसेच ते या गोळ्या फक्त महाराष्ट्र सरकारला देणार असून यासाठी सरकारकडून एकही रुपया घेणार नाहीत. रुबीकॉन कंपनीनं आत्तापर्यंत अशा एक लाख गोळ्या दिल्या आहेत. भविष्यात एकूण 15 लाख गोळ्या सरकारला देण्याचा कंपनीचा निर्धार आहे.

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची स्थिती

दरम्यान, महाराष्ट्रात आज (29 एप्रिल) 597 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 9 हजार 915 इतकी झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). उपचारानंतर बरे झालेल्या 205 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 593 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7 हजार 890 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यभरात आजपर्यंत एकूण 1 लाख 37 हजार 159 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 1 लाख 26 हजार 376 जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला, तर 9 हजार 915 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 62 हजार 860 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 10 हजार 810 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कोरोनामुळे 432 जणांचा मृत्यू

आज राज्यात 32 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 432 झाली आहे. आजच्या मृतपैकी 26 मुंबईचे, तर पुणे शहरातील 3 आहेत. या शिवाय सोलापूर शहरात 1, औरंगाबाद शहरात 1 आणि पनवेल शहरातील एकाचा यात समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 25 पुरुष तर 7 महिला आहेत. आज झालेल्या 32 मृत्यूंपैकी 17 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. या 32 रुग्णांपैकी 15 जणांमध्ये (56 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

संबंधित बातम्या :

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

धारावीत अन्नवाटप करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

वसई विरारमध्ये दिवसभरात 5 रुग्णांची कोरोनावर मात, 130 पैकी 46 रुग्ण बरे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी हीच भाजपची इच्छा : जयंत पाटील

Rubicon pharma giving hydroxychloroquine to Maharashtra Free