चिनी अॅप्सचा धोका होता, तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का? : संजय राऊत
भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut on Chinese Apps Ban).
मुंबई : “चिनी अॅप्सपासून धोका आहे हे आपल्याला आधी माहिती होते तर या कंपन्या का सुरु होत्या? आमच्या वीस जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरु राहिल्या असत्या”, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली (Sanjay Raut on Chinese Apps Ban). भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी आज (30 जून) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut on Chinese Apps Ban).
“चिनी अॅप्सवरील बंदीचं मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही गुलाबजाम होता असं होवू नये”, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.
“चीनचे आर्थिक कंबरडे मोडावे ही सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूतीबाबतही आर्थिक धोरण ठरवले पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये”, असंदेखील संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : चीनच्या 59 अॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अॅप्सचं पुढे काय होणार?
“भारत-चीन सीमावाद हा विषय राजकीय धोरणात्मक आहे. याचे राजकारण होवू नये. सीमेवर आपले जवान समर्थ आहेत. चीनने हल्ला केल्यास सरकारने त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली असल्याचे मी वाचले आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
“काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले यावर केंद्र सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे. राहूल यांचे प्रश्न जरी चुकीचे असतील तरी सरकारने बरोबर उत्तर द्यावे”, असं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर “राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही. देशातील सर्व नागरिक राष्ट्रभक्त आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
“ही लढाई चीन बरोबर आहे. कॉंग्रेस-भाजपा अशी लढाई होवू नये. केंद्र सरकारने चीन सोबत लढावे, विरोधकांशी लढू नये”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा : गलवान खोर्यात चीनची घुसखोरी, सरकार सोनिया-राहुल गांधींना उत्तर देण्यात व्यस्त : सामना