महाविकास आघाडी सरकारचं कर्जमुक्तीचं आश्वासन पुरात वाहून गेलं का? विनायक मेटेंचा सवाल

| Updated on: Feb 04, 2020 | 8:17 PM

विनायक मेटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसंग्रामच्यावतीने महाराष्ट्रात 9 कलमी कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची घोषणा केली.

महाविकास आघाडी सरकारचं कर्जमुक्तीचं आश्वासन पुरात वाहून गेलं का? विनायक मेटेंचा सवाल
Follow us on

नाशिक : महाविकास आघाडी सरकारचं कर्जमुक्तीचं आश्वासन पुरात वाहून गेलं का? असा सवाल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे (Vinayak Mete slams Maha Vikas Aghadi government). विनायक मेटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसंग्रामच्यावतीने महाराष्ट्रात 9 कलमी कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली (Vinayak Mete slams Maha Vikas Aghadi government).

“विधानसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करु, असं आश्वासन दिलं होतं. ही कर्जमुक्ती तुम्ही कधी करणार आहात? पुढे कधीतरी तुम्ही कर्जमाफी कराल, तोपर्यंत सरकार राहील का? तुमचं सरकार देखील पुरात वाहून गेलं आहे का?”, असे खोचक सवाल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना केले.

‘सरकार म्हणजे अशी ही बनवाबनवी’

“महाराष्ट्रात बनवाबनवीचा कारभार सुरु आहे. हे सरकार म्हणजे अशी ही बनवाबनवी आहे. अंतर्गत मतभेद आणि त्यांच्याच कर्माने हे सरकार पडणार आहे”, असा दावा विनायक मेटे यांनी केला.

‘गडकिल्ल्यांचा कायदा अभ्यास करुन बनवायला हवा’

याशिवाय “महाविकास आघाडी सरकारने गडकिल्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कायद्याचं स्वागत आहे. पण हा कायदा अभ्यास करुन करायला हवा होता”, असं विनायक मेटे म्हणाले.

‘आता शिवजयंतीचा वाद नको’

“शिवजयंतीबद्दलचा वाद आतातरी होऊ नये. शिवजयंतीसाठी 19 फेब्रुवारी ही तारीख ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाऊन अभिवादन करावं. शिवसैनिकांना देखील त्यांनी याच दिवशी शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन करावं”, असं आवाहन विनायक मेटेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.

‘मनसेनं शिवमुद्रेचं पावित्र्य जपावं’

दरम्यान, मनसेच्या नव्या झेंड्याबाबत प्रश्न विचारला असता “मनसेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र मुद्रेचा वापर करताना काळजी घ्यावी. शिवमुद्रेचे पावित्र्य जपण्याची गरज आहे. त्यामुळे मनसेनं शिवमुद्रेचं पावित्र्य जपावं”, असं विनायक मेटे म्हणाले.