आधी 49 दिवस कोरोनाला फिरकू दिलं नाही, आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल, वर्ध्याचा ‘गो कोरोना’ पॅटर्न

| Updated on: Jun 05, 2020 | 7:29 PM

राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना वर्ध्यात (Wardha Corona Update) कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला येत आहे.

आधी 49 दिवस कोरोनाला फिरकू दिलं नाही, आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल, वर्ध्याचा गो कोरोना पॅटर्न
Follow us on

वर्धा : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना वर्ध्यात (Wardha Corona Update) कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येत आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून एकही नवा कोरोबाधित रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय 20 पैकी 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रशासनाकडून योग्य खबरदारी आणि नागरिकांचा पुढाकार यातून वर्ध्याची कोरोनामुक्तीच्या दिशेला वाटचाल सुरु आहे (Wardha Corona Update) .

कोरोनाने सुरुवातीला देशभरात आणि राज्यात थैमान घातलं असताना वर्ध्यात प्रशासनाने कोरोनाला 49 दिवस रोखून ठेवलं. अखेर 10 मे रोजी आर्वी तालुक्याच्या हिवरा तांडा गावात कोरोनाने शिरकाव केला. प्रशासनाने त्वरित हालचाली करत स्थिती नियंत्रणात आणली. कोरोना रुग्णांची संख्या 20 वर पोहचली. सेवाग्राम, सावंगी रुग्णालयात उपचार घेऊन अखेर 16 रुग्ण बरे झाले आहेत.

वर्ध्याचा ‘कोरोना गो पॅटर्न’ नेमका कसा होता?

वर्धा जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. यात कोरोना नियंत्रणासाठी सर्वेक्षण हा महत्वाचा भाग होता. आरोग्य विभागाचे 1150 पथकं तयार केली. या पथकांनी 3 लाख घरांना भेट दिली. जिल्ह्यात 11 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये सारीचे 103 रुग्ण आढळले. तर सर्दी, ताप, खोकला या आजाराचे 9658 रुग्ण आढळले. सर्व रुग्णांवर उपचार करुन ठणठणीत करण्यात आलं.

वर्धा जिल्ह्यात कोरोनामुक्तीसाठी त्रिस्तरीय नियंत्रण ठेवण्यात आलं. या त्रिस्तरीय नियंत्रणात आरोग्य, पोलीस, महसूल आणि इतर असे वर्गीकरण करत कामं विभागण्यात आली. वर्ध्यातील कोरोनामुक्तीच्या मोहिमेत जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांचादेखील सर्वाधिक वाटा राहीला.

हेही वाचा : 97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज

वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यावर तातडीने त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून साखळी तोडणं हे महत्वाचं काम होतं. यासोबतच त्रिस्तरीय नियंत्रण समितीमार्फत बाहेर जिल्ह्यातून येणारे, होम क्वारंटाईन असणारे, इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन असणारे आणि आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांवर निगा ठेवली जात आहे. एवढंच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बनवण्यात आलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातूनही सर्वांवर नजर ठेवली जात होती.

सुरवातीला प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलत मॉर्निंग वॉक, नाईट वॉक करणारे आणि कर्फ्युमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांना दम दिला. पण, गुन्हे दाखल करणे हा उपाय नाही हे वेळीच प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी उठाबशा आणि सेल्फीची शिक्षा देवून नागरिकांना सतर्क केलं.

वर्ध्यात 30 जूनपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा या लॉकडाऊनला स्वीकारले आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत. पाच दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे कोरोनाला गो म्हणणाऱ्या वर्धेकरांनी दोन हात करत कोरोनावर खरी मात केली, असं म्हणायला हरकत नाही.


हेही वाचा : बेड-व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त दगावल्याचा आरोप, भाजपचं मूक आंदोलन