माझ्या तोंडातून रक्त निघालं, बुक्के मारले, राहुल गांधींनी सांगितलं मारहाण कशी झाली; आंदोलनात काय घडलं?
मंगळवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केलं, या आंदोलनावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता, मात्र यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुन्हा एकदा दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे मंगळवारी काँग्रेसने देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गाधी यांनी मंगळवारी तब्बल तीन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं, यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
आम्हाला वाटतं हा मध्यवर्ती मुद्दा आहे. त्यावर निर्णय आला पाहिजे. आम्हाला बदल हवा आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीच आम्ही मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं. आम्ही विद्यार्थी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. माझ्या तोंडातून काल रक्त येतं होतं. आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. जितेंद्र सिंह या चर्चेत इरेलव्हंट आहे. चर्चा सोपी आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्यांनी मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मोदींनी माफी मागितील पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान माझं कर्तव्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचं आहे. विद्यार्थी असो, तरुण असो की शेतकरी असो त्यांचा आवाज बुलंद करणं हे माझं काम आहे. त्यांच्या वेदनांना वाचा फोडणं आहे. मला पंच बसला ही मोठी गोष्ट नाही. ही काही समस्या नाही. अजून पंच खायला मी तयार आहे. मला माझ्या सुरक्षेची चिंता नाही. पोलिस मला फरफटत घेऊन गेले. पण माझ्या कानात सांगत होते या सरकारला हटवा. खरंच मी राजस्थानचा आहे, यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घालून आलो आहोत, दुसरा म्हणत होता, मी हरियाणाचा आहे. त्यांना हटवा. हे वास्तव आहे. त्या बिचाऱ्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
