Vishvas Nagre Patil : सर्वधर्मीयांसाठी ही.. कमिश्नर विश्वास नागरे पाटील यांच्या तोंडून हे शब्द ऐकताच टाळ्यांचा एकच कडकडाट
Vishvas Nagre Patil : "रचनात्मक, होकारात्मक पद्धतीने उत्सव साजरा करावा. यासाठी बैठका सुरु आहेत. संगीताला बंदी नाही. ढोल, ताशाला बंदी नाही. फक्त डेसिबल लिमिट पाळणं आवश्यक आहे" असं विश्वास नागरे पाटील म्हणाले.

“डीजे, डॉल्बी रेग्युलेशनचा आदेश मल्टीलेयर डीजे डॉल्बी सिस्टिमसाठी आहे. डोळ्यांना इजा होणाऱ्या लेझर, बीम लाइट संदर्भात बंदीचा आदेश आहे. यामध्ये स्पष्ट करुन इच्छितो की, शेवटच्या पॅराग्राफमध्ये म्हटलय की, जे साऊंड सिस्टिम कायद्याची अंमलबजावणी करताना कायद्याचं उल्लंघन होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जी काही औद्योगिक, व्यापारी आणि रहिवाशी क्षेत्रासाठी जी काही ध्वनी मर्यादा घालून दिलेली आहे. त्याच्या अंतर्गत व्यवस्थितपणे वाजवली जातील. त्या साऊंड सिस्टिमना हा निर्णय लागू होणार नाही” असं नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील म्हणाले. नागपूरात डीजे बंदीवरुन सुरु असलेल्या राजकारणात विश्वास नागरे पाटील यांनी नेमकी डिजे बंदी म्हणजे काय हे समजावून सांगितलं.
“मल्टिलेयर जी डीजे, डॉल्बी सिस्टिम आहे. वाहनांचं मॉडिफिकेशन करुन त्यावर इन्स्टॉल केलं जातं. त्यावर हे निर्बंध आहेत. टॉप, बेस यात बेसमुळे कंपनं निर्माण होतात. त्याला टनेल इफेक्ट म्हणतात. बोगद्यातून ट्रेन गेल्यावर किंवा भूकंपाच्यावेळी जी कंपनं निर्माण होतात, कुठेही ही सिस्टिम चालू असताना डेसिबल मिनिमम 125 च्या वर निघून जातं. हे उल्लंघन स्वाभाविकपणे होतं. प्रतिबंधात्मक स्वरुपाची ही अधिसूचना आहे” असं विश्वास नागरे पाटील म्हणाले. “ही अधिसूचना 60 दिवसांसाठी आहे. याचं नूतनीकरण 100 टक्के होणार. सर्वधर्मीयांसाठी त्यांच्या उत्सवाच्या अनुषंगाने ही अधिसूचना लागू राहिलं याची ग्वाही मी देतो. या बाबत काही दुमत असण्याचं कारण नाही” असं विश्वास नागरे पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
मी मंडळांना नम्रपणे सांगू इच्छितो की..
“मूळात यात मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल होतात. हा पर्यावरण संरक्षण कायद्यातंर्गत गंभीर गुन्हा आहे. यात पाच वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. सुप्रीम कोर्टाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. मी मंडळांना नम्रपणे सांगू इच्छितो की, तुम्ही युवक आहात. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अधिसूचना काढली असं लोकांच्या मनात आहे. पूर्वी उत्सव झाले त्याचं मी निरीक्षण केलं आहे. 1893 साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. जनजागृतीचा उद्देश त्यामागे होता. मरगळलेल्या मनांमध्ये स्फुर्ती निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरु झालंय. हा उत्सव गावागावत पोहोचला. लाखो युवक यात सहभागी होतात” असं विश्वास नागरे पाटील म्हणाले.
संगीताला बंदी नाही
“पश्चिम महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात अधिसूचना काढलेली. गणपती मंडळांनी होकारात्मक पद्धतीने सहकार्य केलेलं. पाच जिल्ह्यातंर्गत 144 पोलीस स्टेशन येतात. तिथे आम्ही यशस्वीपणे राबवलेलं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तुमच्या उत्साहाला आमचा पाठिंबा आहे” असं विश्वास नागरे पाटील म्हणाले.
