शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं!, कापणीचा खर्चही निघणार नसल्यानं बळीराजा हतबल

| Updated on: Oct 21, 2020 | 11:52 AM

बोगस बियाणं आणि नंतर परतीच्या पावसाचा बसलेल्या फटक्यामुळं वर्धा जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. काढणीचा खर्चही निघत नसल्यानं टाकळी गावच्या एका हतबल शेतकऱ्यानं सोयाबीनच्या शेतात जनावरं चरण्यासाठी सोडली.

शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं!, कापणीचा खर्चही निघणार नसल्यानं बळीराजा हतबल
Follow us on

वर्धा: बोगस बियाणं, दुबार पेरणी आणि आता निसर्गाच्या दुष्टचक्राने सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. वर्धा जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं हतबल झालेल्या टाकळी गावच्या नथुजी मंगाम या शेतकऱ्यानं आपल्या तीन एकरच्या सोयाबीनच्या शेतात जनावरं सोडली आहेत. (farmer in Wardha district release animals in Soyabeen farm )

सोयाबीन पिकाकडे शेतकरी नगदी पीक म्हणून पाहतो. सोयाबीनच्या येणाऱ्या पैशातून शेतकऱ्यानं अनेक कामांचं नियोजन केलेलं असतं. पण यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटानं पुरता हैराण झाला आहे. सुरुवातीला बोगस बियाण्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ आली. तरीही शेतकऱ्यानं जवळील सर्व पैसा ओतून मोठ्या आशेनं पेरणी केली. पण निसर्गाच्या दुष्टचक्रानं त्याच्या स्वप्नांवरही पाणी फिरवलं. त्यामुळं नथुजी मंगाम यासारख्या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात जनावरं चरण्यासाठी सोडून दिली आहेत.

परतीच्या पावसाचा तडाखा आणि नेत्यांचे दौरे

परतीच्या पावसामुळं राज्यातील अनेक भागातील शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं सोयाबीन, कापूस, ऊस, भूईमुग अशी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक पातळीवरील नेतेही नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र दौरे करत आहेत. पण या दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या हाती अद्यापही काही लागलेले नाही. त्यापेक्षा या दौऱ्यात राजकारणच अधिक डोकावताना पाहायला मिळत आहे.

गुरुवारी मदतीच्या घोषणेची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करत आहेत. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. मात्र, शेतकऱ्यांना किती मदत दिली जाणार, याचा आकडा मात्र त्यांनी सांगितला नाही.

संबंधित बातम्या: 

रडू नका, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत; मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांचा दौरा रेड कार्पेटवर, फडणवीस आणि मी चिखलातून शेतकऱ्यांच्या बांधावर, दरेकरांचं टीकास्त्र

farmer in Wardha district release animals in Soyabeen farm