उष्णतेवर करा मात, उन्हाळ्यात घराबाहेर जाण्याआधी करा हे उपाय
वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता दिवसा घरा बाहेर जाणे टाळा. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो, परंतु कधीकधी कामासाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत घराबाहेर जाण्याआधी उष्माघातावर मात करण्यासाठी हे उपाय नक्की करा.

सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा पारा जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर या कडाक्याच्या उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी अनेकजण थंड पेय, आईस्क्रिम आणि थंड पाणी पितात. तसेच वाढत्या उष्णतेमुळे उष्मघाताचा त्रास होऊ नये यासाठी अनेकजण आहारात देखील बदल करतात. मात्र या कडाक्याच्या उन्हाळ्यात कधीकधी आपल्याला कामासाठी उन्हात बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत उष्माघाताचा धोका जास्त असतो, कारण तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम वाऱ्यांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, शरीराचे तापमान वाढणे आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तर या वाढत्या उष्णतेपासून आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणे महत्त्वाचे आहे.
उष्णतेच्या लाटांमुळे उष्मघाताचे रूग्ण रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढते. या ऋतूत केवळ त्वचेवर पुरळ आणि अपचनच होत नाही, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. त्यामुळे आपण प्रत्येकांने उन्हाळ्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त घाम आल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे ही स्थिती आणखी बिघडू शकते. तर या समस्या टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण घराबाहेर पडताना कोणती तयारी करावी हे जाणून घेऊयात.
हलके पदार्थ खा
उन्हाळ्यात बाहेर जाताना रिकाम्या पोटी जाणे टाळा. यामुळे चक्कर येऊ शकते. शिवाय एन्झाइम्सच्या निष्क्रियतेमुळे उष्माघाताचा धोका वाढतो. जड मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी काहीतरी हलके खाणे महत्त्वाचे आहे. तुम्ही खिचडी, दही, उपमा, काकडी आणि नारळाचे पाणी यांसारखे द्रव पदार्थ देखील पिऊ शकता.
सुती कापड सोबत ठेवा
जर तुम्ही कडक उन्हात बाहेर जात असाल, तर नेहमी तुमच्यासोबत एक सुती कापड ठेवा. प्रवासात याची खूप मदत होईल. जर ऊन खूप कडक असेल, तर तुम्ही सुती कापडाने घाम पुसू शकता ज्यामुळे खूप आराम मिळतो. तसेच यामुळे तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. तुम्ही याचा उपयोग तुमच्या चेहऱ्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी देखील करू शकता.
सनग्लासेस घालणे आवश्यक आहे
तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यामुळे तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते, ज्यामुळे डोळे कोरडे पडतात आणि दुखतात. म्हणून घराबाहेर जाताना सनग्लासेस नक्की घाला. विशेषतः जर तुम्ही उन्हात फिरायला किंवा सायकल चालवायला जात असाल.
पाण्याची बाटली ठेवा
बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या बॅगेत पाण्याची बाटली नक्की ठेवा. यामुळे प्रवासात तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होईल. तुमची इच्छा असल्यास पाण्यात थोडे लिंबू आणि काळे मीठ घालून ते सोबत ठेवा. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. साध्या प्लास्टिकच्या बाटलीऐवजी पाणी थंड ठेवणारी बाटली वापरा किंवा काचेची बाटली सोबत ठेवणे उत्तम.
डोके झाकण्यासाठी कॅप छत्री सोबत ठेवा
कडक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी डोकं झाकूनच घराबाहेर पडा. टोपी, कॅप किंवा छत्री यांसारखे काहीतरी सोबत घ्यायला विसरू नका. यामुळे तुमच्या डोक्याचे आणि शरीराच्या बहुतेक भागाचे उन्हापासून संरक्षण होते. तसेच उन्हामुळे त्वचा भाजण्यापासून बचाव होतो आणि तुमच्या डोक्याचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते.
सनस्क्रीन लावा
कडक उन्हात उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्याबरोबरच, आपल्या त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या संपर्कात आल्यावर काही लोकांना पुरळ येते, त्यामुळे जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हातांवर आणि पायांवर (उघड्या भागांवर) SPF 50+ असलेले सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)