
जगभरात वाढणारे तापमान आणि वाढती हीटवेव्ह (उष्णतेची लाट) यामुळे फक्त पर्यावरणातच नाही, तर माणसाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. मात्र अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसर्चनुसार, तीव्र उष्णतेमुळे काही संसर्गजन्य आजार वाढण्याऐवजी कमी होण्याचीही शक्यता असते. म्हणजे, तापमान वाढल्यावर सगळीकडे आजार वाढतीलच असं नाही; काही ठिकाणी ते उलटही घडू शकतं.
शोधकांनी लक्षात घेतलं की, उष्णतेचा परिणाम वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा होतो. काही भागांमध्ये जास्त उष्णतेमुळे पॅरासाइट्स (जंतू) अधिक वाढतात, तर काही ठिकाणी हीटवेव्हमुळे ते मरून जातात. याचा थेट संबंध त्या भागातील तापमान, आर्द्रता आणि हीटवेव्ह किती काळ टिकते यावर असतो.
उदाहरणार्थ, डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा फैलाव पाण्यात अंडी घालणाऱ्या डासांमुळे होतो. उष्णतेने अशा डासांच्या वाढीवर कसा परिणाम होतो, हे त्या परिसरातील तापमानानुसार बदलते. खूप गरम वातावरणात डासांचे अंडे मरू शकते, तर सौम्य उष्णतेत त्यांची संख्या वाढते.
या रिसर्चमधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे “वन साईज फिट्स ऑल” पद्धतीने उपचार करता येणार नाहीत. म्हणजेच एकाच उपाययोजना सर्व भागांसाठी लागू न करता, स्थानिक हवामान आणि डेटा लक्षात घेऊन ‘हायपर-लोकल’ म्हणजे अत्यंत स्थानिक पातळीवरची आरोग्यदृष्टी विकसित करावी लागेल.
सध्या चालू असलेल्या हवामान बदलाच्या काळात सार्वजनिक आरोग्यविषयक योजना आखताना केवळ सरसकट धोरण न घेता, विज्ञानावर आधारित, जागोजागी विशिष्ट अशा धोरणांचा अवलंब करावा लागेल. भविष्यात आरोग्य धोरण ‘हायपर-लोकल डेटा’वर आधारित असावं लागेल हे स्पष्टपणे या संशोधनातून समोर येत आहे.
सध्या उन्हाचा तापमान दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन दिनक्रम आरोग्यदायी आणि संतुलित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)