आज परत कोणीतरी गावी जाणार… मंत्र्यांच्या नाराजीवरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

Aaditya Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणावर भाष्य करत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टाला लगावला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

आज परत कोणीतरी गावी जाणार... मंत्र्यांच्या नाराजीवरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं
aaditya thackeray and Eknath Shinde
| Updated on: Nov 18, 2025 | 4:28 PM

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या मंत्री नाराज असल्याचे समोर आले आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्टकार टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तोंडावर भाजपकडून मित्रपक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला जात असल्याने हे मंत्री नाराज असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजीवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. आज परत कोणीतरी गावी जाणार असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करताना म्हटले की, ‘असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!

पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे!
मंत्रीमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…’

भाजपने मिंधे गँगची गाजराची पुंगी केली – दानवे

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. ट्विट करत दानवेंनी म्हटले की, ‘भाजपने मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती. आता फक्त ती मोडून खायला भाजपने सुरू केली आहे, एवढंच! या रुसू बाई रुसू कार्यक्रमाचा फटका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला बसतो.’

CM फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं

शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आज डोंबिवलीतील प्रवेशावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे असं म्हणत गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले या मंत्र्यांना सुनावले असल्याचीही माहिती समोर आली आहे.