अब्दुल सत्तारांचा मोठा गेम काय? चंद्रकांत खैरेंनी केले दोन मोठे गौप्यस्फोट; त्या भेटीमागचं गुपितही फोडलं

Abdul Sattar : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रि‍करणावरही भाष्य केले होते. आता यावर चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे.

अब्दुल सत्तारांचा मोठा गेम काय? चंद्रकांत खैरेंनी केले दोन मोठे गौप्यस्फोट; त्या भेटीमागचं गुपितही फोडलं
Khaire Comment on Sattar Political Plan
Image Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 7:32 PM

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलेले आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रि‍करणावरही भाष्य केले होते. त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची भेटही झाली होती. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी दोन मोठे गौप्यस्फोट केले आहेत. खैरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

अब्दुल सत्तारांचा प्लॅन काय?

अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केली होती. यावर बोलताना खैरे यांनी म्हटले की, त्यांनी जी खदखद व्यक्ती केली ती कदाचित त्यांच्या पातळीवर बरोबर असेल. आम्ही तर त्यांची गंमत पाहतोय. चालू द्या, यांची भांडण होऊ द्या; आम्हाला बरंच वाटतं. त्यांची बैठक झाली, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समजून सांगितलं. मला वाटते दम पण दिला. उद्या चार तारीख आहे ते फॉर्म पाठीमागे घेतील. जो अडीच – अडीच वर्ष सगळ्या मंत्र्यांना वेळ दिला होता, अडीच वर्षानंतर दुसरा मंत्री करू ते करण्याची तयारी सत्तार दाखवत असतील. आम्हाला पुढे घ्या, म्हणजे पुढे अडीच वर्षे मंत्रीपद द्या हे त्यांचा प्लॅन आहे. टायमिंग साधून हे सगळं चाललं आहे, सत्तार खूप हुशार माणूस आहे. कधी इकडे, कधी तिकडे, कधी आमच्या शिवसेनेत आले होते. कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपात चालले होते.

उद्धव ठाकरे निर्णय घेणार

अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी एकमेकांची गळाभेट घेतली होती. या दोघांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटत आहे. यावर बोलताना खैरे म्हणाले की, या दोघांना वाटून काही फायदा नाही, निर्णय घेणारे उद्धव ठाकरे आहेत. तुम्हाला बोलायचं असेल तर उद्धव ठाकरेंकडे जा. उगाच कशाला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. काही निर्णय घ्यायचा असेल तर आपापल्या नेत्यांना जाऊन बोला त्यांना सांगा.

योगायोगाने भेट झालेली नाही…

पुढे बोलताना खैरे यांना या दोन्ही नेत्यांच्या गळाभेटीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना खैरे म्हणाले की, गळाभेट करणं बरोबर नाही, आपले मतदार आहेत ते काय म्हणतील. सत्तार तिकडून येत होते, अंबादास दानवे थांबले होते, त्यांची वाट पाहत आणि त्याच्यानंतर हे झालं. तो तिकडून आला हे तिकडून आला असं नाही. ही ठरवून भेट झाली आहे. ही भेट योगायोगाची नव्हती घडून आणलेली होती, यावर उद्धवसाहेब बोलतील.

Follow Us