आधी बंड, आता ओक्के, मुख्यमंत्र्यांना भेटताच सत्तार यांची प्रश्न टोलवत प्रतिक्रिया, म्हणाले, उद्याच…
Abdul Sattar Meets CM Fadnavis : छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला मिळाली होती. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज सत्तार यांनी CM फडणवीस यांची भेट घेतली आहे.

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला मिळाली होती. मात्र या जागेवर शिवसेनेनेही दावा केला होता. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच भाजपवरही गंभीर आरोप केले होते. काल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्तार काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
कुठेही दगाफटका होणार नाही – सत्तार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, ‘आज मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिला होता. आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. पुढचं राजकारण करताना महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा अशा सूचना ते देणार आहेत. काल उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही भेटलो, त्यांच्याशीही याबाबत आमची चर्चा झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला जाईल यामध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. भविष्यात कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी समन्वयाने राहावं अशा सूचना मुख्यमंत्री देणार आहेत.’
उद्याच…
समीर सत्तार यांच्या उमेदवारीवर बोलताना सत्तार यांनी सांगितले की, उद्या आम्ही आमचा फॉर्म मागे घेणार आहोत. मुख्यमंत्री हे महायुतीचे आहेत, त्यांना आमच्या अडीअडचणी सांगितल्या आहेत. त्याच्यावर मार्ग काढण्याबाबत सर्वांसोबत ते चर्चा करतील. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उद्या सकाळी दहा वाजता बैठक घेणार आहोत आणि अकरा वाजता मुलाचे उमेदवारी मागे घेणार आहे.
नाराजीवर मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाले – सत्तार
पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, माझ्या मतदारसंघात कोणताही वाद विवाद होणार नाही यासाठी मी माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. कोणतेही आश्वासन कोणताही शब्द मी मुख्यमंत्र्यांकडून याच्यासाठी घेतलेला नाही. खालच्या पातळीवर आम्हाला होणारा त्रास पुढे होणार नाही याची दखल ही मुख्यमंत्र्यांनी घेतली. माझी जी नाराजी होती, त्याबाबत मार्ग काढण्याचा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहे.