Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार घेणार होते मोठा निर्णय, सर्वात मोठी बातमी समोर

सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेमध्ये आहे. यावर दावे, प्रतिदावे करण्यात येत आहेत. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून, शरद पवार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर मोठा निर्णय घेणार होते, अशी माहिती समोर येत आहे.

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार घेणार होते मोठा निर्णय, सर्वात मोठी बातमी समोर
sharad pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 2:53 PM

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणावर बोलताना मोठा दावा केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अमोल कोल्हे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणार होते, तशी अजितदादा यांची देखील इच्छा होती. हे सर्व अमोल कोल्हे यांना माहिती आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.  तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विलीनीकरणासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, 12 तारखेला त्या संदर्भात घोषणा होणार होती, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान रोहित पवार यांच्या दाव्या नंतर शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी देखील मोठा दावा केला. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासंदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते. असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. सध्या जनगनणेचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाहीये, अशा स्थितीमध्ये भुजबळांसारखा अभ्यासू नेता वरिष्ठ सभागृहात असायला हवा असं सर्वांना वाटत होतं, त्यासंदर्भात आमची अजितदादांसोबत चर्चा देखील झाली होती. त्याचवेळी बोलण्याच्या ओघात अजितदादा म्हणाले होते की, विलीनीकरणानंतर भुजबळ हे राज्यसभेवर जाऊ शकतात असा दावा कोल्हे यांनी केला होता.

दरम्यान आता नवी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यात सक्रिय राहणार होते, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व जबाबदारी अजित पवारांकडे येणार होती, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपत आहे, मात्र शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं अशी अजितदादा यांची इच्छा होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.