
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार असलेल्या मराठी बांधवांनाही धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनाचे दु:ख हे सातासमुद्रापार जाणवत आहे. लंडनमधील ‘DoubleTree by Hilton London – Marble Arch’ येथे छत्रपती शिवाजी महाराज युवक संघटनेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शोकसभेची सुरुवात अत्यंत भावूक वातावरणात झाली. उपस्थित मराठी बांधवांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या दादांना आदरांजली वाहिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धीरजसिंह तौर यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. “अजितदादा म्हणजे कामाचा धडाका आणि शब्दाचा पक्का माणूस. त्यांनी केवळ महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला नाही, तर परदेशात राहणाऱ्या मराठी माणसाचीही दखल घेतली,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात अजितदादांनी लंडन येथील ‘महाराष्ट्र भवन’साठी जाहीर केलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला. ही मदत केवळ निधी नव्हती, तर परदेशातील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी दिलेले ते एक मोठे योगदान होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रशासनावरील त्यांची पकड आणि जनसामान्यांच्या कामासाठीची त्यांची तत्परता यावरही मान्यवरांनी प्रकाश टाकला.
दरम्यान लंडन आणि परिसरातील मराठी समाजातील नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात धीरजसिंह तौर यांच्यासह सुनील पाटील, स्वराज मोहिते, आशुतोष धमले, स्वप्नील गावडे, पवन खरात, कौस्तुभ रमेकर, यशवंत गुरव आणि यश सुतार या कार्यकर्त्यांनी व सदस्यांनी परिश्रम घेतले. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक गमावला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत शांत आणि आदरपूर्ण वातावरणात या शोकसभेची सांगता झाली.
दरम्यान अजित पवार यांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी एका भीषण विमान अपघातात झाले. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आणि जाहीर सभांसाठी जात होते. त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना हा अपघात झाला. धावपट्टीच्या जवळ पोहोचताच विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले, त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील दोन वैमानिक आणि दोन सुरक्षा रक्षक अशा एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.