
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत एका विमान अपघातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांच्या जवळचे लोक अजूनही सावरलेले नाहीत. त्यातच आता अजित पवारांचा पुतण्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघातप्रकरणी भाष्य केले आहे.
रोहित पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांचा विमान अपघाताप्रकरणी विविध खुलासे केले आहे. यावेळी त्यांनी फ्यूल टँक, विमानाचे लँडिंग आणि व्हिजीबिलीटी यावर सविस्तर प्रेझेन्टेंशन सादर केले.
पहिले कॅन पेटले नंतर विमानातील पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणावं लागेल. मुंबईवरुन हे विमान जात असताना ते पूर्ण विमान फ्यूलने भरले होते. ते फुल कशाला भरायचे, तुम्ही इथून उडत असताना जर तुम्ही लगेचच बारामतीवरुन हैदराबादला जाणार होता. तर तुम्ही तिथे जाऊन फ्यूल भरु शकला असता. काही लोक म्हणतील की महाराष्ट्रात स्वस्त फ्यूल आहे. तसंच सुरतमधील फ्यूल जास्त स्वस्त आहे. पण त्यात ३५०० फ्यूल जर बसत असेल तर त्याला ३० ते ३५ हजाराचा फरक पडतो. एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचे कारण काय, त्यामुळे मुद्दाम पायलटचा वापर करुन घातपात झाला असावा, त्या घातपातामध्ये मोठा स्फोट होईल, असा प्लॅन असावा, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
मी जो दाखवतोय तो इमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे. पण त्यांनी डीजीसीएला त्यांचा अधिकृत प्लॅन सांगितला नव्हता. ते पुन्हा पुण्याला लँड करु शकत नाही कारण पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नव्हते कारण डिफेन्सचं फ्लाईंग सकाळी होतं. सोलापूर देऊ शकत नाही, त्यातचही अडचणी आहेत. त्यांना दुसरं कोणतं द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त चिपी विमानतळ देऊ शकतात. पण तेही देऊ शकत नाहीत. कारण तिथे धुकं असू शकतं. मग पर्याय म्हणून फक्त मुंबई उरतं… त्यामुळे तुम्ही उगाचच जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन ३००० ची व्हिजीबिलीटी जी ५००० पेक्षा कमी आहे हे डिजीसीएच नॉर्म आहे. त्यामुळे एकतर तुम्ही उडायला नको होतं. जर उडालात तर तिथे लँड करण्याचा प्रयत्न करायला नको होता, असा मोठा खुलासा रोहित पवार यांनी केला.
तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. पण फ्यूल भरलेले होते. आत अधिकचे टँक होते. त्यामुळे परत जाण्यापेक्षा हे विमान खाली आदळण्यात आले. ते मुद्दामून आदळण्यात आले, असं आम्हाला वाटतंय, असाही आरोप रोहित पवार यांनी केला.