साहित्य संमेलन स्थळावरुन नवा वाद; कौतिकराव ठाले पाटलांच्या विधानाचा प्रतिवाद

| Updated on: Jan 08, 2021 | 11:13 PM

साहित्य संमेलन नेमकं कुठे होणार आहे, याबाबत आता वाद सुरु झाला आहे. (Akhil Bharatiya Sahitya Sammelan New Controversy)

साहित्य संमेलन स्थळावरुन नवा वाद; कौतिकराव ठाले पाटलांच्या विधानाचा प्रतिवाद
Follow us on

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होण्यापूर्वी वादाला सुरुवात झाली आहे. यंदा 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मात्र साहित्य संमेलन नेमकं कुठे होणार आहे, याबाबत आता वाद सुरु झाला आहे. (Akhil Bharatiya Sahitya Sammelan New Controversy)

यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होईल, अशी घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली होती. मात्र हे संमेलन दिल्लीत घेतलं जावं, अशी मागणी इतिहास संशोधक आणि ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनावणी यांनी केली होती. त्यामुळे साहित्य संमेलनांच्या ठिकाणावरुन वाद सुरु झाला आहे.

नेमका वाद काय?

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज (8 जानेवारी) औरंगाबादमध्ये साहित्य संमेलनाची घोषणा केली. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होईल, असे ठाले-पाटील यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची घोषणा 24 जानेवारी होईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आलं.

यंदा कोरोनामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार, अशी घोषणा करण्यात आली.

दरम्यान कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून नवी दिल्लीत संमेलन घ्यावे, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र दिल्लीत कोरोनाचा कहर सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सेलू आणि अमळनेर येथील आयोजक संस्थांनी दिल्लीत साहित्य संमेलन भरवण्याबाबत शंका उपस्थित केली होती.

याशिवाय पुण्याच्या सरहद या संस्थेनेही दिल्लीत कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजित करत नसल्याचं कळवलं असल्याचं ठाले पाटील यांनी सांगितले होते. त्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या साहित्य संमेलनाचं आयोजकत्व नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे देण्यात आलं होतं.

येत्या मार्च महिन्यात अखेरीस अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचं नियोजन आहे. मात्र अद्याप या संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाही.

संजय सोनावणी यांची टीका

कौतिकराव ठाले पाटील, किमान खरे बोलायला तरी शिका. सरहद संस्थेने दिल्लीला साहित्य संमेलन घ्यायची मागणी गेल्या एक वर्षापासून लावून धरली आहे. त्यावर आपण आजवर कधी कोरोनाचे निमित्त देऊन संजय नहार मोदी-शहाचे हस्तक आहेत, असा बिनडोक आरोप करून दिल्लीला टाळत टोलवाटोलवी करत राहिलात, अशी टीका संजय सोनावणी यांनी केली आहे.

अगदी कालच म. टा. मध्ये दिलेल्या मुलाखतीतही तुम्ही धूर्त आणि मस्तवाल राजकारणी गावगुंडाप्रमाणे बेलगाम सुटला होतात. आणि आज मात्र “सरहद”ला आम्ही संधी दिली होती ती त्यांनीच घालवली अशा आशयाची प्रेसनोट व तीही साहित्य महामंडळाच्या लेटरहेडवर काढून पुन्हा नवी चाल खेळत सरहदच्या प्रामाणिक हेतूवर बेअक्कल तारे तोडून साहित्य महामंडळ आणि सरहदला हेतुपुरस्सर बदनाम केले आहे.

महामंडळावर राहण्याचा कसलाही नैतिक अधीकार तुम्हाला उरलेला नाही. तुम्ही महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीवर फडकवावा या उदात्त भावनेचेच शत्रू म्हणजे तमाम महाराष्ट्राचे आधुनिक “अब्दाली” ठरला आहात. तुमचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, असेही संजय सोनावणी यांनी म्हटले आहे. (Akhil Bharatiya Sahitya Sammelan New Controversy)

संबंधित बातम्या :

वसंत गीते आणि सुनील बागुलांच्या प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे