
Bacchu Kadu Criticized State Government: अमरावतीत चोरट्यांनी पोलिसांनाच नाही तर न्याययंत्रणेला पण आव्हान दिले आहे. चोरट्यांच्या धाडसाची आणि पोलिसांच्या धाकाची एकच चर्चा राज्यभर चर्चा रंगली आहे. अमरावतीत पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल केल्या जात आहे. कारण ही तसंच आहे. अमरावतीत पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींवरून राज्यात खळबळ उडालेली असतानाच आता बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार केला आहे. त्यांनी सरकारचं मापच काढलं आहे.
घटना तरी काय?
अमरावती येथील कांतानगरमध्ये न्यायाधीशांची आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आहे. त्यातील पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी हातसफाई केली. त्यांनी चोरी केली. चोरांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेवेळी न्यायाधीश हे कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. पण न्यायाधीश आणि कर्मचारी सुट्टीनिमित्त बाहेर गावी असल्याचे हेरूनच ही चोरी झाल्याचे सध्या तरी समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पण न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात. त्यांच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असतो. अशावेळी या परिसरात चोरट्यांनी हे अचाट धाडस केलेच कसे असा सवाल केल्या जात आहे. तर विरोधकांना या चोरीच्या घटनेमुळे आयते कोलीत हाती लागले आहे. बच्चू कडूंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
राज्यात न्यायाधीश खतरे में
अमरावतीच्या कांतानगर मधील पाच न्यायाधीशांच्या आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाल्याप्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. चोरांनी आता न्यायाधीशाच्या घरावर दरोडे टाकले आता त्यांनी मंत्र्यांच्या घरावर दरोडे टाकले पाहिजे.. तसंही हे सरकार शेतकऱ्यांच्या घरावर रोज दरोडे टाकत आहे; न्यायाधीशाच्या घरावर दरोडा पडते त्याची बातमी होती पण रोज शेतकर्यांच्या घरावर दरोडा पडते त्याचं काय? असा सवाल त्यांनी केला.
या देशात हिंदू खतरे मे है म्हटले जाते आता न्यायाधीश देखील खतरे मे आले आहे. बटेंगे तो कटेगे म्हटलं जातं परंतु आता न्यायाधीशांवरच बटण्याची वेळ आली आहे. देवा भाऊ तुमची वानरसेना केव्हा काम करणार तुमच्याकडे गृह खातं आहे. न्यायाधीशाच्या घरी जर चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचे काय राहिलं. देवा भाऊ तुमचं नाव आहे पण देवासारख राज्य येणार कधी तुमच्याकडून अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.