‘उखाड के फेक देंगे’, बच्चू कडू सर्वात जास्त आक्रमक, राणांविरोधात हल्लाबोल

भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू हे महायुतीत आहेत. असं असताना त्यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अमरावती लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवला आहे. त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने आज अर्ज दाखल केला. यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भाषणातून राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.

उखाड के फेक देंगे, बच्चू कडू सर्वात जास्त आक्रमक, राणांविरोधात हल्लाबोल
आमदार बच्चू कडू
| Edited By: | Updated on: Apr 03, 2024 | 3:29 PM

अमरावती लोकसभा मतदारसंघाकडून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी प्रहार पक्षाकडून भव्य रॅली काढण्यात आली. बच्चू कडू स्वत: या रॅलीत सहभागी झाले. यावेळी बच्चू कडू यांनी आक्रमक भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला. “हम डरते नहीं. डराने वालो को हम डराते है. तानाशाही नहीं चलेगी. उखाड के फेक देंगे. आमची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण निवडणुकीच्या तोंडावर गडी ऐकायला तयार नव्हता. या निवडणुकीत राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. दिनेश बूब हा सच्चा रुग्णसेवक आहे. वर्षभर गोरगरीब लोकांना दिनेश बूब जेवण जेवू घालतात. श्रीमंतांच्या विरोधात ही लढाई आहे. एकाच घरात खासदार, आमदार नवरा-बायको आहेत. आम्ही फक्त मत मारायचे का?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

“जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा देशांतील नेते पाहत राहतील. तुम्ही हळदी-कुंकू घेता. इकडे फिनल मिलचा कामगार आत्महत्या करत आहे. आमचा प्रहार पक्ष स्वतंत्र आहे.आम्ही सर्वसामान्य माणसाचे गुलाम आहोत. काल एक चिठ्ठी आली जास्त बोलाल तर जेलमध्ये जाल. बच्चू कडू कार्यकर्त्यांची अवलाद आहे. दुपट्टा घातला आणि नेता झाला अशी परिस्थिती नाही. जेलमध्ये टाकलं तरी जेलमधून आवाज काढणार. रामदेव बाबाने उद्योग सुरू केले. बचत गटाचे काय? मोदी म्हणायचे अच्छे दिन आएंगे. हे आहेत का अच्छे दिन? 17 रुपयांच्या फाटक्या साड्या वाटल्या. हेच का अच्छे दिन?”, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

‘… तर आईची शपथ आम्ही सोडणार नाही’

“निवडणूकमध्ये मेळघाटमध्ये साड्या वाटता. तिथं पाण्याची गरज आहे. रोजगारची गरज आहे. गोडावूनमध्ये पडलेल्या साड्या वाटल्या आहेत. या जिल्ह्याची जर कोणी प्रतिमा खराब करत असेल तर आईची शपथ आम्ही सोडणार नाही. जातप्रमाण पत्रात सांगितले आहे की, हा गुन्हा आहे. पण अजून निकाल नाही. म्हणून राणा आता जनतेच्या न्यायालयात आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘मातोश्री म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान’

“मातोश्री म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान. तिथे हनुमान चालिसा म्हणता. हनुमान चालीसा म्हणायची असेल तर फिनले मिलसाठी म्हणा. पियुष गोयल यांच्या घरासमोर म्हणा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असलेल्या तुषार भारतीय यांच्या घरावर करा. राणांनी हल्ला केला. नेते मॅनेज झाले. पण भाजपचे स्वाभिमानी कार्यकर्ते राणाला मत मारणार नाही. पटातील बैलजोडी सारखे हाकलून लावू यांना. उद्याचा दिवस कसा असेल हे माहीत नाही. आम्ही आगीत पाय टाकला आहे. ही आग विझू देणार नाही. कदाचित उद्या जेल मध्येही जावं लागेल. आत्मविश्वासाने सांगतो डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला.