बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं, नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला

| Updated on: Sep 30, 2022 | 3:01 PM

कार्यकर्ते नेत्यांना बनवितात. सार्वजनिक ठिकाणी अशी मारहाण करणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे.

बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं, नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला
नवनीत राणांनी आणखी असा दिला सल्ला
Image Credit source: social media
Follow us on

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : दसरा मेळाव्यावरून उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray ) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्या संख्येवरून चर्चा सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कुणाकडं किती कार्यकर्ते जमणार, यावर वक्तव्य समोर येत आहेत. यासंदर्भात खासदार नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे सीएम होते. तेव्हा संघर्ष केला असता तर आजची परिस्थिती आली नसती. शिवसेनेचे कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे पुढं नेत आहेत. बाळासाहेबांना मानणारे खरे कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतील. तर बळजबरीनं येणारे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात राहतील.

महाराष्ट्र हा विचारावर चालणारा आहे. त्यांच्या विचारातून माहिती पडते. जो संविधान आहे, त्यानुसार न्याय मिळतो. बहुमत एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. त्यामुळं धनुष्यबाणही शिंदे यांच्याकडं येईल, असं मला वाटते, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी बाप चोरणारे असं म्हटलं. पण,बाळासाहेबांची विचारधारा ही शिंदे यांच्यासोबत आहे. बाळासाहेबांकडून दहा टक्के अडाप्ट केले तरी खूप काही करता आलं असतं. पण, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे राज्याच्या जनतेसाठी काही केलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधार झाला नाही. जो संघर्ष करतो तो इतिहास बनवितो. उद्धव ठाकरे हे संघर्ष करू शकत नाही. त्यामुळं ते इतिहास बनवू शकत नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

अमरावतीचं मंत्रिपद कुणाकडं, यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, बच्चू कडू यांचा राग, नियंत्रण हातातून जात आहे. ते स्पष्ट दिसतं. पेशंस सुटलेलं दिसून येत आहे. कार्यकर्त्यांला मारहाण प्रकरणातून हे स्पष्ट झालं आहे.

कार्यकर्ते नेत्यांना बनवितात. सार्वजनिक ठिकाणी अशी मारहाण करणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे. बच्चू कडू यांनी मारहाण केली नाही, असं म्हटलं. नकार दिला असला, तरी व्हिज्युअल्स दिसतात. त्यातून कार्यकर्त्यांचा कसा अपमान करतो, हे दिसून येते.

अपमान करताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. स्टेजवर आम्ही असतो. तेव्हा खाली बसून छतरंजी उचलणारा हा आमचा कार्यकर्ता असतो. त्यामुळं त्यांचा मानसन्मान राखला पाहिजे, असा सल्ला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिला.