फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून…अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. भाजपाने नौटंकी बंद करावी. हिंमत असेल तर त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात 33 टक्के आरक्षण देऊन 13 महिलांना मंत्रिपद द्यावे, असे आव्हानही दमानिया यांनी केले.

फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून...अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले!
anjali damania and devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2026 | 8:53 PM

Anjali Damania : नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत बहुमताअभावी फेटाळले गेले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके तसेच अन्य पक्षांवर सडकून टीका केली. काँग्रेस हा पक्ष महिलाविरोधी आहे, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील देशाने विरोधकांची नौटंकी पाहिली. विरोधकांनी नारीशक्तीच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दरम्यान, आता फडणवीस यांच्या याच टीकेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून 33 टक्के आरक्षणाप्रमाणे महिला मंत्री आणा, असे थेट आव्हान दिले आहे.

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

“सुधारवादी विचारांसाठी हा काळा दिवस आहे. विरोधी पक्षांनी बँड वाजवून डान्स केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे. ती म्हणजे महिला आरक्षणाचे हे विधेयक 2023 सालीच मंजूर झाले. पण 2024 साली याच भाजपाने महाराष्ट्रात 149 जागांपैकी फक्त 15 महिला उमेदवार दिले. एवढंच नव्हे तर राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त चार महिला आहे,” असा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला.

तसेच, पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. त्यांनी 13 ते 14 महिलांना मंत्रिपद द्यावे. मगच तुम्हाला नारीशक्तीबाबत काही वाटतं, असे आम्ही समजू, असे आव्हानही दमानिया यांनी दिले. भाजपाने तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी जे नाटक चालवले आहे, ते बंद करावे. लोकांना सगळं समजतं, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, याआधी लोकसभेत बहुमताअभावी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक नामंजूर झाले. त्यानंतर विरोधकांनी भाजपाचे मनसुबे हाणून पाडले, असे म्हणत एकजूट दाखवून दिली. तर मोदी यांनी विरोधक हे महिलाविरोधी असून देशातील महिला त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असा हल्लाबोल केला. तसेच भविष्यातही आम्ही हे विधेयक परत आणू असे संकेतही दिलेले आहेत.

Follow Us