अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंबाबतचा नवा बॉम्ब… पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध फाईल्स देण्याचा गंभीर आरोप केला आहे. तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट यांनी हे फाईल्स दमानिया यांना दिल्याचा दावा आहे. पंकजा मुंडे यांनी या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे, तर धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे हे तेजस ठक्कर नावाच्या व्यक्ती बरोबर माझ्याकडे आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे यांच्या विरोधातील त्या फाईल होत्या, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. आता यावर भाजप नेत्या आणि पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानिया यांचा नवीन आरोप काय?
अंजली दमानिया यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं, असे धनंजय मुंडेंना वाटत होतं, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे स्वत: एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्ती बरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे यांच्या विरोधातील त्या फाईल होत्या. त्या फाईल्सची माहिती, माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थित सांगितलं की, मी असं कुणाच्या दिलेल्या फाईलवर कधीही कारवाई करत नाही. म्हणून मी पंकजा मुंडे यांचा कोणताही विषय तेव्हा लावून धरला नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.
पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय?
आता यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. पंकजा मुंडे या जालन्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी जात असताना पंकजा मुंडे यांना टीव्ही ९ मराठीच्या पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी थांबवले.
त्यावर पंकजा मुंडे यांनी कशावर प्रश्न आहे, असे पत्रकाराला विचारले. त्यावर पत्रकाराने अंजली दमानिया असे म्हटले. यावर पंकजा मुंडे यांनी “मला या प्रश्नावर बोलायचे नाही”, असे सांगत बोलण्यास नकार दिला.
यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेच्या अनुपस्थितिबद्दलही भाष्य केले. “आता मला बीड जिल्ह्यात पळायचं आहे. माझ्या जिल्ह्यात कार्यक्रमाला उशीर झाला आहे,. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका संबंधी सादर झाल्यास बोलेन. दुसऱ्यांचे काय चालले हे मला काय माहिती? कोणाचे काय चालले आहे, हे मला काय माहिती, त्यांची तब्येत बरीच दिवस झालं बरी नाही”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
