
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना मिळालेल्या कथित क्लीन चीटवरून महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. पार्थ पवार यांना क्लीनचीट देणारी बातमी पूर्णपणे खोटी आणि राजकीय हेतूने पेरलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील काही नेते स्वतःच्या हातात सूत्रे घेण्यासाठी घाई करत आहेत, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पार्थ पवारांबद्दल भाष्य केले. कोणताही अधिकृत अहवाल अद्याप बाहेर आलेला नसताना बातम्या कशा काय छापून येत आहेत? खारगे समितीला असा निकाल देण्याचा किंवा क्लीनचीट देण्याचा कोणताही अधिकार नाही. ही बातमी त्यांच्याच गटाकडून किंवा राजकारण्यांनी युतीचा भाग म्हणून माध्यमांमध्ये पेरली आहे, असे अंजली दमानिया म्हणाले. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई असल्यानेच ही प्रतिमा सुधारण्याची मोहीम राबवली जात असल्याचेही अंजली दमानिया म्हणाल्या.
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवरही अंजली दमानिया यांनी भाष्य केले. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या प्रकारची घाई केली जात आहे. त्यावरून समाजात मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. माझ्या मते भाजपची बी टीम उरलेले सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी हे सर्व घडवून आणले आहे. त्यांना आता पक्षाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घ्यायची आहेत, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.
यावेळी अंजली दमानिया यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सर्रास सुरू आहेत. याचे व्हिडिओ माझ्याकडे रोज येतात. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि नाईक यांच्या नवी मुंबईत हे प्रकार सर्वाधिक आहेत. व्ही आर एस कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण मुख्यमंत्र्यांनी ते केले नाही. ब्लॅक बॉक्समधील माहिती का रिकव्हर होत नाही?” असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
मंत्रालयात आज प्रत्येक कामाला रेट कार्ड आहे. ही लोकं कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून पैसे घेतात, याची चौकशी व्हायला हवी. सुनेत्रा पवार जर झिरवाळ यांच्यावर नाराज आहेत, तर त्या पार्थवर का नाहीत? तो मुलगा आहे म्हणून त्याला सोडून दिले जाते का? अशीही टीका अंजली दमानिया यांनी केली. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मेसेज करून या प्रकरणाच्या अहवालाची PDF मागितली आहे. जोपर्यंत अधिकृत अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत बातम्या देणे चुकीचे आहे. राजकीय दबावाखाली अहवाल बाहेर येऊ दिले जात नाहीत, जसे एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात घडले होते, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.