सर्वात मोठी बातमी! तर आदित्य ठाकरे विधानसभेत येऊच शकले नसते, सचिन अहिर यांच्या विधानाने खळबळ
२०१९ मध्ये मी जर योग्य निर्णय घेतला नसता, तर ठाकरे कुटुंबातील जी व्यक्ती विधानसभेत येऊ पाहत होती, ती येऊ शकली नसती असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या गटात प्रवेश करताच सचिन अहिर विधानसभा उपसभापती म्हणून निवडून आले. आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता 2019 सालच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
सचिन अहिर यांनी 2019च्या निवडणुकीवर वक्तव्य केले आहे. “उपसभापती पद मिळाल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी स्वतःहून फोन करून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. मी लवकरच त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराची धुरा माझ्याकडे होती. त्यावेळी संपूर्ण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणूक झाल्या. जागा आल्या. सर्व घडवून आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. २०१९ मध्ये मी जर योग्य निर्णय घेतला नसता, तर ठाकरे कुटुंबातील जी व्यक्ती विधानसभेत येऊ पाहत होती, ती येऊ शकली नसती,” असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
“राऊतसाहेबांनी दखल घ्यावी”
पुढे ते म्हणाले की, मी २०१४ नंतर पक्ष वाढीसाठी जी तयारी केली, म्हणूनच त्यांनी २०१९ मध्ये मला सोबत घेतले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मी नेहमीच बजावली आहे. तसेच त्यांनी राऊतसाहेबांनी त्यांच्या ‘रोखठोक’ सदरामध्ये या सर्व घडामोडींची दखल घ्यावी असेही म्हटले आहे.
नवीन प्रवासाला सुरुवात करण्याबाबत बोलताना सचिन अहिर म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, नवीन जिद्दीने आणि जोमाने कामाला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, तरीही प्रकृती अस्वास्थ्याची पर्वा न करता ते तिथूनच वॉर रूमचा आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सामाजिक सेवेच्या सुरुवातीपासून, गेली ३० वर्षे ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल रोजी या पवित्र स्थळावर येऊन नतमस्तक होण्याची माझी परंपरा आहे. मला मिळालेल्या घटनात्मक पदाचा मान राखून, या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे. घटनेनुसार पुढे काम करण्याची जिद्द मला मिळावी आणि सर्व घटकांना सामान्याना न्याय देता यावा, याच भावनेतून आज मी नतमस्तक झालो.”
