आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील एक विचित्र योगायोग; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Asha Bhosle Death : आशा भोसले यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आशा भोसले आणि त्यांची बहीण व दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामध्ये एक योगायोग आहे, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

महान गायिका आशा भोसले यांचे आज मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगा आनंद भोसले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. या बातमीमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. मात्र, तुम्हाला माहिती नसे की आशा भोसले आणि त्यांची बहीण व दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामध्ये एक योगायोग आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या निधनाचा योगायोग
आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोन बहिणी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज आहेत. लता मंगेशकर यांना भारताची कोकिळा म्हटले जायचे, तर आशा भोसले यांना प्रेमाचा आवाज असे म्हटले जात असे. दोघींनीही बॉलिवूडमधील हजारो गाण्यांना आपला आवाज दिला. 6 फेब्रुवारी 2022 रोजी रविवारी, वयाच्या 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्याचप्रमाणे, नेमक्या 4 वर्षांनी म्हणजे 22 एप्रिल 2026 रोजी रविवारीच वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांचेही निधन झाले. त्यांनीही मुंबईतील याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हा एक अनोखा योगायोग ठरला आहे.
मुलाने दिली निधनाची माहिती
समोर आलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांची प्रकृती काही काळापासून बिघडलेली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रुग्णालयातून बाहेर येऊन मुलगा आनंद सांगितले की, सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अंतिम दर्शन घेता येईल आणि सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. तर डॉक्टर प्रतीत समदानी यांनी, आशा भोसले यांचे मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाल्याची माहिती दिली. तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ‘आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.
12 हजारांहून अधिक गाणी गायली
आशा भोसले यांचे नाव भारतीय संगीताच्या इतिहासात कायम सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 8 दशकांच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे 12 हजारांहून अधिक गाणी गायली, जो एक अनोखा विक्रम आहे. त्यांची ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘ये मेरा दिल’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘इन आंखों की मस्ती के’ आणि ‘दिल चीज क्या है’ ही गाणी आजही अमर आहेत.