Aurangabad | औरंगाबाद महापालिकेची शुक्रवारी प्रभाग आरक्षण सोडत, चार वॉर्डांच्या प्रभागाची नवीच चर्चा!

| Updated on: Aug 03, 2022 | 6:00 AM

मंगळवारी औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रा डॉ. अभिजित चौधरी यांनी हाती घेतली. यापूर्वी अडीच वर्षे आस्तिक कुमार पांडेय यांच्या हाती महापालिका आय़ुक्त आणि प्रशासक पदाची सूत्रे होती.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेची शुक्रवारी प्रभाग आरक्षण सोडत, चार वॉर्डांच्या प्रभागाची नवीच चर्चा!
औरंगाबाद महापालिका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार येत्या शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी औरंगाबाद महापालिकेची (Aurangabad municipal corporation) प्रभाग आरक्षण सोडत (Reservation lottery) काढली जाणार आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्व इच्छुकांच्या नजरा लागल्या असतानाच शहरात आणखी एका चर्चेने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. महापालिकेत सध्या तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. मात्र आता चार वॉर्डांचा प्रभाग होणार, अशी चर्चा नव्यानेच सुरु झाली आहे. तीन वॉर्डांचे गणितच कसे जुळवणार, याचं आव्हान पक्षांसमोर असताना चार वॉर्ड झाले तर काय होतील, या विचारानेच नेते हैराण आहेत. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्यानंतर औरंगाबादमध्येही चार वॉर्डांचा प्रभाग होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य काय?

चार दिवसांपूर्वीच भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक महापालिकेत चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं. आपला हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. महाविकास आघाडी सरकारने महापालिकेतील वाढवलेली सदस्य संख्या चुकीची असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. बावनकुळे यांच्या या नव्या भुमिकेमुळे अनेकांच्या पोटात गोळा उठल्याचे चित्र आहे. मागील अडीच वर्षांपासून महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत. येथे प्रशासक राज आहे. सध्या मनपा निवडणुकीसाठी तीन वॉर्डांची रचना करण्यात आली आहे. येत्या 05 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

मतदार याद्यांचं काम सुरु

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार औरंगाबाद महापालिका निवडणूक विभागाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. येत्या 05 ऑगस्ट रोजी महिला, अनुसूचित जाती, जमाती, खुल्या प्रवर्गातील वॉर्ड कोणते आहेत, यासंबंधीची सोडत काढली जाईल. शुक्रवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी ही आरक्षण सोडत काढण्यात येईल. नवीन प्रभागानुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचारी घेण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितलं.

मनपावर आता नवे प्रशासक

दरम्यान, मंगळवारी औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रा डॉ. अभिजित चौधरी यांनी हाती घेतली. यापूर्वी अडीच वर्षे आस्तिक कुमार पांडेय यांच्या हाती महापालिका आय़ुक्त आणि प्रशासक पदाची सूत्रे होती. आता सांगलीचे जिल्हाधिकारी असलेल्या डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबाद मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मंगळवारी आस्तिक कुमार पांडेय यांनी त्यांचे स्वागत केले. मनपात प्रवेश करताचा डॉ. अभिजित चौधरी यांनी सर्व प्रमुख विभागांना भेटी दिल्या.