औरंगाबाद शिवसेनेची यंदा ध्वज दिवाळी, 50 हजार घरांवर भगवा फडकवण्याचा विक्रम करणार
1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत शहरातील पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज लावले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या काळात रेकॉर्डब्रेक घरांवर भगवे ध्वज लाहतील, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होईल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचा गड (Aurangabad Shivsena) मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात शिवसेनेने यंदा अनोख्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरवलेले दिसत आहे. शिवसेनेने 1 ते 3 नोव्हेंबरदरम्यान ध्वज दिवाळी अभियान हाती घेतले आहे. या काळात पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज लावले जाणार आहेत, असी माहिती शिवसेनेने काल पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक विक्रम करणारः अंबादास दानवे
आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यात शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने यंदा दिवाळीत ‘ध्वज दिवाळी अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ध्वज दिवाळी हे अभियान 1 ते 14 नोव्हेंबरपर्यंत राबवले जाणार असून 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत शहरातील पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज लावले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या काळात रेकॉर्डब्रेक घरांवर भगवे ध्वज लाहतील, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होईल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या अभियानात आणखी काय उपक्रम?
– 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत पन्नास हजार घरांवर भगवा फडकवणार – 4 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या भल्या पहाटे घाटी रुग्णालय परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांना पहाटे अभ्यंगस्नान घातले जाणार आहे. शिवसेनेतर्फे यासाठी गरम पाणी, साबण, उटणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. – सहा नोव्बेंबर रोजी शहरात ठिकठिकाणी आकाशदिव्यांच्या धर्तीवर ‘विकास दीप’ लावले जाणार आहेत. शहरात होत असलेल्या विकास कामांची उद्घोषणा विकासदीप च्या माधअयमातून केली जाणार आहे. – या निमित्ताने शहरात 200 विकासदीप लावले जातील. – सात नोव्हेंबर रोजी महिला आघाडीच्या वतीने कोरोना योद्ध्यांसोबत भाऊबीज साजरी केली जाणार आहे. – शहरातील 33 स्मशानभूमींमध्ये काम करणारे स्मशानजोगी व त्यांच्या कुटुंबियांसोबतही याच दिवशी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. – सात नोव्हेंबर रोजी बीड बायपास येथील फटाका मार्केट, टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदान, नारळीबाग येथील पावन गणे मंदिर परिसरात विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेतली जाणार आहे. – 14 नोव्हेंबर रोजी तापडिया नाट्य मंदिरात ‘मी सावरकर बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला खैरेंची मात्र गैरहजेरी
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. त्यामुळे काल झालेल्या पत्रकार परिषदेले अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल हे तीन आमदार होते. मात्र चंद्रकांत खैरेंची गैरहजेरी होती. हे दोघेही परस्परांच्या कार्यक्रमांना जात नाहीत, असा इतिहास आहे. यावेळीही तेच दिसून आले. दरम्यान पत्रकार परिषदेला काल माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, संघटक रेणुकादास वैद्य उपस्थित होते.
इतर बातम्या-