Aurangabad: बहुचर्चित पाणीपुरवठा योजनेत अडथळा, रस्ते प्राधिकरणाची 6 कोटींची अट! काय आहे नेमकं प्रकरण?
शहरातील 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योजनेतील प्रमुख जलवाहिनी टाकण्याचे काम पैठण रस्त्यावर लवकरच सुरु होणार होते, मात्र यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
औरंगाबादः शहरात मोठा गाजावाजा करत सुरु असलेल्या नवीन पाणीपुवठा योजनेतील मुख्य जलवाहिनी पैठण रोडलगत टाकण्यात येणार आहे. ही वाहिनी टाकण्यात मोठी अचण निर्माण झाली आहे. MJP अर्थात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही वाहिनी रस्त्यालगत टाकण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे म्हणजेच NHAI कडे परवानगी मागितली होती. त्यानुसार NHAI ने जलवाहिनी टाकण्यासाठी तब्बल पाच कोटी 87 लाखांचे शुल्क भरण्याचे पत्र एमजेपीला पाठवले आहे. त्यामुळे आता एमजेपीचे अधिकारी गोंधळात पडले आहेत. हे शुल्क एमजेपीने भरायचे की महापालिका भरणार, यावरून आता वाद सुरु झाला आहे.
45 किलोमीटरची प्रमुख जलवाहिनी
डिसेंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. ही योजना पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. पैठण रोडलगत नक्षत्रवाडी ते जायकवाडी अशी 45 किलोमीटर लांब 2500 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी एमजेपीने 6 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार एनएचएआयच्या नागपूर कार्यलयाच्या सूचनेनुसार या जलवाहिनीसाठी परवानगी देण्याकरिता शुल्काची मागणी करण्यात आली आहे. दैनिक दिव्य मराठीत यासंदर्भातले वृत्त प्रकाशित झाले आहे.
पत्रात काय लिहिलंय?
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने एमजेपीला पाठवलेल्या पत्रातील मजकूर असा- 3 ऑगस्ट 2018 रोजीच्या परिपत्रकानुसार, रस्त्याच्या जागेवर जलवाहिनी टाकण्यासाठी 5 कोटी 24लाख 85 हजार 795 रुपये शुल्क भरावे लागेल. त्यावर 12 टक्के जीएसटी असे एकूण 5 कोटी 87 लाख 84 हजार रुपये तसेच 1 कोटी 93 लाख रुपयांची बँक गॅरंटी एनएचएआय चेअरमनच्या नावे जमा करावी.. या पत्रानंतर आता हे शुल्क कोण भरेल, यावरून वाद सुरु झाला तर आधीच रखडलेल्या जलवाहिनीच्या कामाला आणखी विलंब होईल, अशी प्रतिक्रिया एमजेपीचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड यांनी दिली आहे.
इतर बातम्या-