वैभवशाली इतिहास असूनही पैठण दुर्लक्षित, औरंगाबाद-पैठण रस्त्याचा डीपीआर मंजूर, विकासाचा मार्ग मोकळा!
औरंगाबादपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या तालुक्याकडे रस्त्याअभावी पर्यटक आणि भाविकांनी दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम पैठणच्या अर्थकारणावरही झाला आहे. मात्र आता रस्त्याचे काम मार्गी लागल्यावर उशीरा का होईना, पैठणच्या विकासाचाही मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादः औरंगाबाद ते पैठण (Aurangabad to Paithan Road) या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. नुकताच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार झाला आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अर्थात NHAI च्या दिल्ली येथील मुख्यालयाला प्रकल्पाचा डीपीआर पाठवण्यात आला आहे. यानंतर आराखड्याला मंजुरी मिळताच भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया सुरु होईल. अर्थात या प्रक्रियेसाठीही साधारण वर्षाचा कालावधी लागणार असला तरीही येत्या निदान या रस्त्याच्या चौपदीकरणाच्या प्रक्रियेतील मार्ग मोकळा झाल्यामुळे औरंगाबाद आणि पैठणच्या नागरिकांमध्ये (Aurangabad Citizens) आनंदाचे वातावरण आहे.
दहा वर्षांपासून मागणी, अखेर प्रक्रिया सुरु
पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे मागील दहा वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. आधी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. तेव्हा तो राज्य महामार्ग होता. त्यानंतर 2020 मध्ये रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले. हा रस्ता NHAI च्या ताब्यात गेला. NHAI ने दोन वर्षात केवळ डीपीआर तयार केला. दिल्लीतील एका एजन्सीने या रस्त्याचा डीपीआर तयार केला असून त्याला आता मंजुरी मिळाली आहे.
कसा असेल रस्ता?
औरंगाबाद ते पैठण या रस्त्यावर चितेगाव, बिडकीन आणि ढोरकीन ही तीन मोठी गावं लागतात. या तिन्ही गावांना बायपास केला जाणार आहे. त्याममुळे या तिन्ही गावांच्या बाहेरून पूर्ण वाहतूक वळेल. तसेच नक्षत्रवाडी आणि गेवराई तांडा या गावांमध्ये उड्डाणपूल केले जाणार आहेत. त्यामुळे वाहने विना अडथळा धावतील, असे नियोजन डीपीआरमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले.
किती खर्च, किती भूसंपादन?
या रस्त्यासाठी अधिकचे भूसंपादन करण्यासाठी 600 कोटी रुपये खर्च तर चौपदरीकरणासाठी 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही किंमत डीपीआरमध्ये नोंदवलेली आहे. NHAI च्या मुख्यालयाने डीपीआरमध्ये दुरुस्त्या, सुधारणा सुचवल्या तर ही किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते.
रस्त्याविना पैठण दुर्लक्षित
औरंगाबादमधील पैठण तालुक्याला वैभवशाली इतिहास आहे. जिल्ह्यात वेरूळ, अजिंठा बघण्यासाठी राज्यभरातून आलेले पर्यटक पैठणचे संत एकनाथ महाराजांचे मंदिर, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणी साडी सेंटर पाहण्यासाठी आवर्जून येत. मात्र अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या तालुक्याकडे रस्त्याअभावी पर्यटक आणि भाविकांनी दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम पैठणच्या अर्थकारणावरही झाला आहे. मात्र आता रस्त्याचे काम मार्गी लागल्यावर उशीरा का होईना, पैठणच्या विकासाचाही मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या-
