दिवाळीत चार लाखांचे खाद्यतेल, 55 हजारांची मिठाई जप्त, औरंगाबादेत कारवाई

| Updated on: Nov 10, 2021 | 5:14 PM

दिवाळीदरम्यान अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने विशेष पथकांनी जप्त केलेल्या संशयास्पद खाद्यतेलाचे बाजारमूल्य 4 लाख 2 हजार 470 रुपये आहे. यापैकी जप्त केलेल्या 349 किलो मिठाईची किंमत 55 हजार 590 रुपये आहे.

दिवाळीत चार लाखांचे खाद्यतेल, 55 हजारांची मिठाई जप्त, औरंगाबादेत कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः शहरात दिवाळी सणादरम्यान मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (Food And Drugs Administration) केलेल्या धडक कारवाईत मिठाई विक्रेत्यांचे धाबेच दणाणले. एफडीएच्या पथकाने औरंगाबाद शहरासह (Aurangabad city And District) जिल्ह्यातील विविध भागातील उपहारगृहे, हॉटेल, स्वीटमार्ट आदीमधील मिठाई, खवा, खाद्यतेल, नमकीनचे 52 नमूने तपासणीला घेतले. तसेच जवळपास 04 लाख रुपयांचा खाद्यतेलाचा साठ आणि 55 हजारांची मिठाई जप्त केली. दिवाळीच्या निमित्ताने मिठाईची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यात निकृष्ट दर्जाचा खवा वापरला जातो.

04 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा साठा जप्त

दिवाळीदरम्यान अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने विशेष पथकांनी जप्त केलेल्या संशयास्पद खाद्यतेलाचे बाजारमूल्य 4 लाख 2 हजार 470 रुपये आहे. यापैकी जप्त केलेल्या 349 किलो मिठाईची किंमत 55 हजार 590 रुपये आहे. असा एकूण 4 लाख 58 हजार 60 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

भेसळ रोखण्यासाठी शासनाची कारवाई

दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मिठाई तयार करण्यासाठी त्यात भेसळयुक्त खव्याचा किंवा इतर अपायकारक साहित्याचा वापर केला जातो. असे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने मिठाई, नमकीन संदर्भात जास्तीत जास्त दुकानांची तपासणी करावी. संशयास्पद प्रकरणी असा माल जप्त करावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले होते. त्यानुसार एफडीए विभागाने विशेष पथकामार्फत दिवाळीत विशेष पथकामार्फत शहर आणि जिल्हाभरातील उपहारगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल, मिठाई व तेल भांडारांची तपासणी केली. यात संशयास्पद 52 नमुने तपासणीसाठी घेतले गेले. हे नमूने आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध विभागातील अन्न सहायक आयुक्त अजित मैत्रे यांनी दिली.

इतर बातम्या-

Crime: औरंगाबादेत हत्येची मालिका सुरूच, मुकुंदवाडीत दोन दिवसात दोन महिलांची हत्या

औरंगाबादेत नवाब मलिक यांचा पुतळा जाळला, मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्यांची मागणी